| माणगाव | प्रतिनिधी |
निजामपूर विभगातील शिरवलीत शेतकर्याच्या भाताच्या मळणीला अचानक आग लागली. या आगीत भात व पेंढा संपूर्ण जळून खाक झाला. या घटनेमुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. आग लागल्याचे कळताच आजूबाजूचे गावातील ग्रामस्थांनी आग विझवली.
शिरवली येथील भाऊ आबाजी ढेबे या शेतकर्याने सुमारे 700 भाताचे भारे मळणीसाठी अंगणात रचून ठेवले होते. अचानक लागलेल्या आगीत सर्व भारे जळून खाक झाले आहेत. शिरवली गावचे तलाठी श्री. वाघ यांनी घटनेचा पंचनामा केला असून, सुमारे 80 हजारांचे नुकसान झाल्याचे सांगितले. या शेतकर्याची राष्ट्रवादी काँ. पक्षाचे निजामपूर विभागीय अध्यक्ष संदीप जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून विचारपूस करून त्यांना तात्काळ तांदूळ व आर्थिक मदतीचा हात दिला.