। मुरुड । वार्ताहर ।
3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात मुरुड शहरातील समुद्रकिनारी असलेल्या 44 टपरी धारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान मुरुड तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांच्या अध्यक्षतेखाली नायब तहसीलदार रवींद्र सानप, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या उपस्थितीत नुकसानीबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांनी टपरीधारकांच्या समस्या जाणून घेऊन नगरपरिषदेचे वार्षिक भाडे ठराव घेऊन शंभर टक्के माफ करण्याचे आदेश दिले आहेत. चक्रीवादळ झाल्यानंतर शासनातर्फे नुकसानग्रस्त टपर्यांचे पंचनामे केले. परंतु कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. तेव्हा मुरुड नगरपरिषदेने टपरीचे वार्षिक भाडे तरी माफ करावे, अशी मंडळातर्फे मागणी करण्यात आली होती. नगरपरिषद प्रशासनाने ठराव घेऊन पन्नास टक्के वार्षिक भाडे माफ केले होते. परंतु या स्टॉलधारकांना कोव्हिड लॉकडाऊनमुळे पन्नास टक्के भाडे भरणेही कठीण होऊन गेले होते. या संदर्भात बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांनी टपरीधारकांना दिलासा देत शंभर टक्के भाडे माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी टपरीधारकांतर्फे पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर, उपाध्यक्ष दिव्या सतविडकर, दामोदर खारगावकर, महेंद्र पाटील, देवेंद्र सतविडकर, तन्वी भायदे, दीपक जोशी, शकील शाबान, निर्मला सतविडकर आदी उपस्थित होते.