। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रुप ग्रामपंचायत आपटा हद्दीतील कोरळवाडी येथील आदिवासी बांधव स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत. रस्त्याच्या प्रस्तावास मंजुरी न दिल्यास उपवन संरक्षकांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्यासह आदिवासी बांधवांनी दिला आहे. ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते आणि कोरलवाडीतील आदिवासी बांधवांनी रायगड जिल्ह्याचे उपवन संरक्षक आशिष ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबतचे लेखी निवेदन दिले असून कोरलवाडीच्या रस्त्याच्या प्रस्तावावर पुढील पंधरा दिवसांत कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान या परिसरात समाजकार्य करणारी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था मागील पाच वर्षांपासून वाडीच्या रस्त्यासाठी पाठपुरावा करीत आहे. पुढील पंधरा दिवसात सदर 3 (2) च्या प्रस्तावास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मंजुरी न दिल्यास रायगड जिल्हा उपवनसंरक्षक यांच्या अलिबाग येथील कार्यालयासमोर पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याबाबतचे लेखी निवेदन या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्यासह कोरलवाडी ग्रामस्थ प्रतिनिधी भानुदास पवार, गुरुदास वाघे, संतोष पवार, रवींद्र वाघे यांनी मुख्य वन संरक्षक व उपवन संरक्षक यांना दिले आहे.