नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
| पनवेल | प्रतिनिधी |
गेल्या तीन दिवसांपासून दररोज खारघर परिसरात सिडकोकडून अशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.
दरम्यान, याबाबत केटीसीडब्ल्यूएने (खारघर तळोजा कॉलॉनिज वेल्फेअर असोसिएशन) सिडको जल विभागाचे प्रमुख अभियंता श्री. मुल यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी नवीन पाण्याची पाईपलाईन नुकतीच कार्यान्वित झाली आणि त्याचमुळे पाणी गढूळ येत असल्याचे कारण दिले. याबाबत केटीसीडब्ल्यूएचे अध्यक्ष मंगेश रानवडे यांनी सिडकोकडून शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, याबाबत त्वरित मार्ग न काढल्यास नागरिकांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.