शेकापच्या तक्रारीची आयुक्तांकडून गंभीर दखल
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
माणकुळे, ता.अलिबागचे सरपंच भाजपचे सुजित जनार्दन गावंड यांना ग्रामपंचायतीच्या कारभारात केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांनी बडतर्फ ठरविले आहे.
याबाबतची तक्रार शेकापचे सत्यविजय पाटील, रामकृष्ण पाटील, कमलाकर पाटील यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ.महेेंद्र कल्याणकर यांनी याबाबतचा निकाल देत गावंड यांना पदावरुन बडतर्फ केले आहे. तसा आदेश (दि.14) जारी करण्यात आला आहे.
गावंड यांनी सरपंचपदाचा गैरवापर केल्याची तक्रार दाखल झाल्यावर त्याबाबतची चौकशी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत करुन त्याचा अहवाल जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आला. या अहवालानुसार गावडं यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात आर्थिक अनियमितता केल्याचे दिसून आल्याने त्यांना महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1959 चा 3 कलम 39 अन्वये विभागीय आयुक्त कल्याणकर यांनी भवन यांनी सरपंच पदावरून बडतर्फ करुन टाकले. याबाबत संबंधितांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी तीन वेळा व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीच्यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्राम) सहाय्यक गटविकास अधिकारी, विद्यमान व तत्कालीन बीडीओ,अर्जदार रामकृष्ण शामसुंदर पाटील व अन्य दोन तसेच गैर अर्जदार सुजित गावंड हे उपस्थित होते.
जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार गेल्या दोन वर्षात ग्रामपंचायतीमध्ये कोणतेही काम झालेले नाही. रस्त्यावर दिवे लावण्यात आलेले नाहीत. आरोग्याच्या दृष्टीने कोणतेही काम झालेले नाही. प्रत्यक्ष जागेवर पाहणी न करता वस्तुंची खरेदी झाली की नाही हे न तपासता केवळ तांत्रिक बाबी बघून कामाचा अहवाल तयार करण्यात आला असल्याचे सीईओंनी आपल्या अहवालात नमूद केलेेले आहे. मात्र सरपंच सुजित गावंड यांनी ग्रामपंचायतमध्ये तसेच हद्दीत झालेली खरेदी ही आजही जागेवर उपलब्ध आहे. माझ्यावर झालेले सर्व दोषारोप हे बेकायदेशीर तसेच चुकीच्या माहितीवर आधारित असल्याने ते मला मान्य नसल्याचे त्यांनी आपल्या युक्तीवादात नमूद केलेे.
तक्रारदारांच्यावतीने अॅड.प्रशांत राहूल यांनी कामकाज पाहिले. दरम्यान माणकुळेतील भ्रष्ट सरपंचाची उचलबांगडी झाल्याबद्दल शेकाप कार्यकर्त्यांनी तक्रारदार सत्यविजय पाटील, रामकृष्ण पाटील, कमलाकर पाटील यांचे अभिनंदन व्यक्त केले.
