| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील (जि.रायगड) माणकुळे ग्रामपंचायतीचे सरपंच सुजित गावंड यांनी ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराबाबत योग्य ती चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शे.का. पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी सभागृहात विशेष उल्लेखाद्वारे केली. सरपंच सुजित जनार्दन गावंड यांनी भ्रष्टाचार, अपहार व बेजबादारपणे वर्तणूक केल्यामुळे सत्यविजय शंकर पाटील व रामकृष्ण शामसुंदर पाटील यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 नुसार अर्ज दाखल करून त्याच्या सुनावणी अंती मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांनी सरपंच सुजित जनार्दन गावंड यांना प्रथमदर्शनी दोषी असल्याबाबतचे निष्कर्ष काढून तसा अहवाल विभागीय आयुक्त, कोकण विभाग, कोकण भवन यांच्याकडे सादर केलेला आहे. कोकण विभागीय आयुक्त यांनी सदर अहवालावर आजपर्यंत कोणती कार्यवाही केली याबाबतचा अहवाल व माहिती संबंधित विभागास देण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी जयंत पाटील यांनी सभागृहात विशेष उल्लेखाद्वारे केली.