पालीकरांवर पाणी टंचाईचे संकट

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्याचे मुख्यालय व अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीत वर्षानुवर्षे पाणी टंचाईची समस्या गंभीर आहे. पालीकरांना येथील अंबा नदीतून पाणी पुरवठा होतो. पावसाळा संपल्यावर येथून काही अंतरावर असलेल्या बलाप गावाजवळील अंबा नदीच्या के.टी. बंधा-याचे दरवाजे लावून अंबा नदीचे पाणी अडविले जाते. मात्र कोलाड पाटबंधारे विभागाकडून अजूनही हे दरवाजे न बसविल्याने अंबा नदीचे पाणी घटत चालले असून पालीकरांवर अघोषित पाणी टंचाईचे संकट ओढावू शकते. या संदर्भात अनेक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. मागील वर्षी देखील हीच परिस्थिती निर्माण झाली होती. नदीचे पाणी घटल्याने जॅकवेल मधील पाणी खेचणारे 3 मोटार पंप देखील जळाले होते. त्यावेळी नदीची पाणी पातळी वाढविण्यासाठी अंबा नदी जवळील पुलाजवळ तात्पुरता बंधारा बांधला होता. यंदा देखील अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर येथील बंधार्‍याला प्लेट टाकाव्या अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Exit mobile version