रायगड जिल्ह्यात जमावबंदी लागू


| रायगड | वार्ताहर |

जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या शिफारशीनुसार आणि अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार शुक्रवार दि.9 ते दि.24 मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या औद्योगिक भागांमध्ये कामगार संघटनांकडून आंदोलन व संप पुकारले जात असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय धार्मिक व जातीय तणावाचे प्रसंग, तसेच आगामी बुद्ध पौर्णिमा सोमवार (दि.12) मे, संभाजी महाराज जयंतीवर प्रहार संघटनेचे आंदोलन बुधवार (दि.14) मे आणि पत्रकार फिरोज पिंजार यांचे ठिय्या आंदोलन बुधवार (दि.14) यामुळे देखील अस्थिरता उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

जमावबंदी दरम्यान 'या' गोष्टींवर बंदी 

शस्त्र, लाठ्या, सुरे, तलवारी इ. वस्तू बाळगणे, स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ घेऊन फिरणे, दगडफेक किंवा क्षेपणास्त्रे बाळगणे व तयार करणे.

प्रतिमा किंवा आकृत्यांचे सार्वजनिक प्रदर्शन करणे, आक्षेपार्ह घोषणा, गाणी किंवा वाद्य वाजविणे, धोकादायक भाषण, हावभाव, चित्रप्रदर्शन पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव परवानगीशिवाय जमविणे.
यांना मिळणार सूट 

या अधिसूचनेतून शासकीय अधिकारी, शासकीय कर्तव्यावरील कर्मचारी, तसेच शवयात्रा व अंत्यविधीसाठी जमणारा जमाव, आणि तहसीलदारांच्या परवानगीने आयोजित कार्यक्रम वगळण्यात आले आहेत.

तहसीलदार किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यासच कोणताही उत्सव, सभा, मिरवणूक आयोजित करता येणार असून, त्याची जबाबदारी आयोजकांची असेल. पोलीस व जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
Exit mobile version