वीज वितरण कंपनीचा निष्काळजीपणा
। नागपूर । प्रतिनिधी ।
चंद्रपुरात आकाशवाणीपासून जगन्नाथ बाबानगरकडे जाणार्या रस्त्यावर तुटून पडलेल्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्याने एका सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रभाकर गणपत क्षीरसागर असे मृताचे नाव असून ते दाताळा येथील रहिवासी आहे.
चंद्रपूर शहरातील जगन्नाथ बाबा नगर येथील ए 65 क्रमांकाच्या खांबावरून 11 केव्ही विजेची तार जाते. रविवारी (दि. 04) संध्याकाळी आलेल्या पाऊसमुळे ही तार तुटून रस्त्यावर पडली. काही स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीला याची तातडीने ऑनलाईन तक्रार केली. मात्र, महावितरणच्या कर्मचार्यांनी वीज पुरवठा बंद केला नाही किंवा पडलेली तारसुद्धा उचलली नाही.
यादरम्यान याच रस्त्याने जात असताना क्षीरसागर यांच्या सायकलच्या चाकात विजेची तार अडकल्याने ते पडले आणि त्यांचा तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दाताळा व जगन्नाथ नगरमधील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. नुकसान भरपाईचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका मृताच्या कुटुंबीयांनी घेतली. अखेर विज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह सामान्य रुग्णालयात नेण्यात आला.
वीज वितरण कंपनीला ऑनलाईन तक्रार करूनही एक ते दीड तासापर्यंत 11 केव्हीची तुटून वर्दुळीच्या रस्त्यावर पडलेली विजेची तार उचलण्यास व वीज पुरवठा बंद करण्यास वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी-कर्मचार्यांनी अक्षम्य विलंब केला. वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे एका निष्पाप नागरिकाच्या नाहक बळी गेला.