| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राजकारणात वरिष्ठ नेत्याच्या भूमिकेवर सार्वजनिकपणे आक्षेप घेणे ही सहज घडणारी बाब नाही. मात्र, शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते तथा रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी जाण्याच्या निर्णयावर शिंदे गटातीलच आ. महेंद्र दळवी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. गोगावलेंची भूमिका चुकीची होती असे सांगत दळवींनी थेट पालकमंत्र्यांनाच अशा भेटी टाळण्याचा सल्ला दिला. यावरुन गोगावले-तटकरे भेटीने दळवींची पोटदुखी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.
गणपती दर्शन घेणे चुकीचे नसल्याचे दळवींनी स्पष्ट केले. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील मागील राजकीय संघर्ष तसेच कार्यकर्त्यांच्या भावनांचा संदर्भ देत गोगावलेंनी तटकरेंच्या घरी जाणे टाळायला हवे होते, अशी भूमिका त्यांनी मांडली. भरतशेठ ज्येष्ठ आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत; पण जाणे टाळले पाहिजे होते, असे म्हणत दळवींनी खदखद व्यक्त केली.
विशेष म्हणजे, गोगावले आणि तटकरे यांच्यातील राजकीय जवळीक वाढत असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दळवींची ही पोटदुखी समोर आली आहे. यापूर्वीही दळवी आणि शिवसेनेचे आ. महेंद्र थोरवे यांनी तटकरे कुटुंबाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचवेळी गोगावले मात्र तटकरे कुटुंबाशी समन्वय साधताना दिसत आहेत.
गोगावले-तटकरे भेटीनंतर आता प्रश्न केवळ एका गणपती दर्शनाचा राहिलेला नाही. महायुतीतील स्थानिक राजकीय समीकरणे बदलत असताना, आमदारांनी पालकमंत्र्यांच्या भूमिकेवरच सार्वजनिकपणे सवाल उपस्थित करणे ही रायगडच्या राजकारणातील लक्षवेधी घडामोड ठरली आहे. आता यावर पालकमंत्री भरत गोगावले काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.





