पालकमंत्रीपद महिलेला दिल्यामुळे नाराज असल्याचे वक्तव्य
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे. अशा या रायगड जिल्ह्यात युतीमध्ये लढत असताना 5 जागा युतीने जिंकल्या. त्यामध्ये 1 अपक्ष व 1 राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळाली. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्री देण्यात आल्याने रायगडचे शिवसेनेचे आमदार नाराज होते. छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आणि त्यातही एका महिलेला पालकमंत्री पद दिलं जातंय हे उचित नव्हतं, असे बेताल वक्तव्य बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांनी मराठी वृत्तवाहिनेला मुलाखत देताना केले. त्यामुळे आ. दळवींना महिलांबद्दल किती आदर आहे, हे यावरुन स्पष्ट झाले आहे. याशिवाय त्यांच्या वक्तव्यावरुन त्यांची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसवर आहे कि, महिलांवर असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ज्येष्ठ नेते असताना राष्ट्रवादी काँग्रेेसला पालकमंत्रीपद देणे चुकिचे असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र त्यांनी महिला म्हणून ज्या पद्धतीने हिणवले ते अत्यंत चुकिचे वक्तव्य असल्याचा आरोप जिल्ह्यातील महिलांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायमच महिलांचा आदर केला. त्यांना मानसन्मान दिला. असे असताना छत्रपतींचे नाव घेऊन महिलेचा अनादर करणे, ही कट्टर शिवसैनिकांसह संपूर्ण रायगडकरांसाठी लज्जास्पद घटना आहे. याबाबत माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांना विचारले असता त्यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून बंडखोर आमदार अमिषाला बळी पडून, ईडीला घाबरुन सत्तेत सहभागी झाले. या लोकांनी महिलांचा अवमान केल्याचा धक्का बसला नाही. कारण हे आरएसएसचे संस्कारच आहेत. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वातील हे सरकार भाजपप्रणित सरकार आहे. जे आरएसएसचे बीज आहे, ते तसंच बोलणार. तशीच त्यांनी गरळ ओकली. छत्रपती शिवरायांच्या रायगडमध्ये एक स्त्री म्हणून अदिती तटकरे पालकमंत्री झाल्या, याचा कायम अभिमान राहिल. शिवरायांची हीच शिकवण होती. कारण छत्रपती स्वतःच्या आईला म्हणजेच जिजाऊंना गुरु समजत. राजमाता जिजाऊ नसत्या तर हे स्वराज्य दिसलं नसतं. त्यामुळे जिजाऊ माँसाहेबांसारखी महिला या राज्यात झाली, त्याचा आदर्श आम्ही सार्या महिला घेत आहोत. त्याचा आम्हाला अभिमान आहे.
सक्षणा सलगर, राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्ष
महेंद्र दळवी यांचे वक्तव्य चुकिचे आहे. अदिती तटकरे यांनी पालकमंत्री म्हणून अडीच वर्षे सक्षमपणे काम केले आहे. पवार साहेबांच्या शिकवणीप्रमाणे छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा जपत रायगडचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न पालकमंत्र्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला व पुरुष असा भेदभाव केला जात नाही.
उमा मुंढे, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष