नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील खांडपे ग्रामपंचायत मधील सांगवी गावाला दरडी कोसळण्याचा धोका आहे.गावाच्या मागे असलेला डोंगर भूस्खनन होऊन गावावर कोसळण्याची भीती ग्रामस्थांना असल्याने स्थानिक ग्रामपंचायत मधील रहिवासी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी डोंगर भागाची पाहणी केली.
खांडपे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे सांगवी गावाला भुस्खलनाचा धोका असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 29 जुलै 2021 ते दिनांक एकऑगस्ट 2021 रोजी पश्चिम घाट माथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याबबात शासनाने सूचित केले आहे, कर्जत तालुक्यातील भारतीय भूवैज्ञानीक सर्वेक्षण विभागाने कळविले प्रमाणे भुस्खलन होणार्या गावांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रनेस गावात भुस्खलनाचा धोका असल्यामुळे गावातील नागरिकांस सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्यास सूचित केले आहे.
त्या यादीत असलेल्या सांगवी गावचे नाव असून डोंगराच्या कुशीत असलेल्या त्या डोंगरभागाची पाहणी स्थानिक ग्रामस्थ यांच्यासोबत रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पाहणी केली.आपल्या गावाच्या नावाचा समावेश भूस्खनन होणाऱ्या गावात असल्याने ग्रामस्थ घाबरले आहेत.त्यामुळे संबंधित गावाची माहिती सुधाकर घारे यांनी रायगड जिल्हाच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या कानावर घातली.त्यावेळी पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना सोबत घेऊन येत संबंधित वस्तुस्थितीची पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे.ग्रामस्थ यांनी नंतर गावाच्या संभाव्य धोक्याबद्दल कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांची भेट घेऊन या प्रकरणी तात्काळ लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली.