। अलिबाग । प्रतिनिधी ।
यावर्षी मे महिन्यात पाऊस पडला. त्यामुळे भात शेतीसह फळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले. घरे, गोठ्यांची पडझड झाली. त्यामुळे शेतकर्यांसह नागरिकांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेकाप रोहा तालुक्याकडून करण्यात आली आहे. याबाबत रोह्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसाचा फटका रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यालादेखील बसला. आंबा, फणस, केळी, नारळ, चिकू, पेरू अशा अनेक बागायती शेतीचे खूप नुकसान झाले. या पावसामुळे गुरे, घरांची पडझड झाली. रोहा तालुक्यातील कोलाड व नागोठणे परिसरातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एक महिना अगोदर पाऊस पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रोहा तालुक्यातील शेतकरी, नुकसानग्रस्त नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून एकरी चाळीस हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी रोहा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.