| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड आगारातून मुरुड-साळाव फेर्या वाढवा, अशी मागणी सतत प्रवाशांकडून व वृतपत्र विक्रेते यांच्याकडून होत आहे. परंतु, मुरुड आगार व्यवस्थापक याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेल्या एसटीमधून शेकडो प्रवासी मुरुड बसस्थानकातून प्रवास करत असतात. परंतु, रेवदंडा पुलाच्या दुरुस्तीमुळे अनेक गाड्या मुरुड आगारातून कमी केल्याने सकाळच्या दरम्यान साळाववरुन मुरुडकडे येणार्या प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. त्यात साळाव स्टॉपजवळ प्रवासी शेड नसल्याने प्रवाशांना कडक उन्हात एसटीची वाट पाहावी लागत आहे.
या संदर्भात आगार व्यवस्थापक निता जगताप यांच्याकडे मुरुड तालुका पत्रकार संघाचे पदाधिकार्यांनी साळाव-मुरुड एसटी सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान सुरू करावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी जगताप यांनी गाडी सुरू करु असे सांगितले होते. परंतु आज त्याला 15 दिवसांपेक्षा जास्त अधिक काळ होऊनसुध्दा एसटी त्यावेळेत सुरू होत नसल्याने प्रवाशी व वृत्तपत्र विक्रेते दिलीप गुंजाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.