कुलगुरू डॉ. संजय भावे यांचे शास्त्रज्ञांना आवाहन
| कर्जत | प्रतिनिधी |
बदलत्या वातावरणामुळे सातत्याने ऋतुचक्र प्रभावित होत असून, अन्नसुरक्षेस धोका निर्माण झाल्याने शाश्वत उत्पन्नासाठी शास्त्रज्ञांनी बदलत्या हवामानास पूरक भात जाती व तंत्रज्ञान विकसित करावे, असे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी येथे केले. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या सह्याद्री अतिथीगृह सभागृहात आयोजित महाराष्ट्र राज्य वार्षिक भात चर्चासत्राच्या समारोपीय सत्रात प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे माजी सहायक महासंचालक डॉ. एन.डी. जांभळे, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एम.सी. खरकवाल, भारतीय भात संशोधन संस्था हैदराबादचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए.एस. हरिप्रसाद, इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालय, रायपूरच्या वनस्पती पैदास व अनुवंशिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दीपक शर्मा, आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे समन्वयक डॉ. विकास कुमार सिंग, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. रमेश कुणकेरकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ. शिवराम भगत व भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे उपस्थित होते.
डॉ. भावे पुढे म्हणाले की, नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी राज्याच्या संशोधकांना पुरेसे मनुष्यबळ, निधी व अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अपुर्या सोयीसुविधा असतानाही शास्त्रज्ञांची कामगिरी प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी लवकरच सेवानिवृत्त होणारे प्रख्यात भात शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. जे.पी. देवमोरे यांचा सत्कार संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थितांचे आभार भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे यांनी मानले.