रायगडातील पाच लाख मुलामुलींना देणार जंतनाशक गोळ्या


13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम

| प्रतिनिधी |

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यातील एक वर्ष ते 19 वर्ष वयोगटातील 5 लाख 44 हजार 396 मुलामुलींना मंगळवारी (दि.13) जंतनाशक गोळ्या देण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. त्याकरिता 6 लाख अल्बेडॅझोल गोळ्या वितरीत करण्यात आलेल्या आहेत. 3 हजार 518 शाळा, 3 हजार 322 अंगणवाड्यांमधून अल्बेडॅझोल गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जंतनाशक गोळ्या देण्याची मोहिम यशस्वी करण्याकरिता ग्रामीण भागातील एकूण 54 प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच 280 आरोग्य उपकेंद्रे या ठिकाणी कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका सहभाग नोंदविणार आहेत. तसेच शहरी भागामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रूग्णालय यांच्यामार्फतही मोहीम राबविण्यात येणार आहे.

जंत दोषामुळे बालकांमध्ये ऍनिमियाचा सर्वाधिक धोका उद्भवतो शिवाय आतड्यांना सूज येणे, पोटदुधी, भूक मंदावणे, उलट्या, अतिसार तसेच इतर आजार उद्भवतात. या आजारांना आळा घालण्यासाठी वर्षातून दोन वेळा बालकांनी जंतनाशक गोळी घेणे गरजेचे आहे. ज्या मुलामुलींना कोणत्याही कारणाने 13 फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळी मिळाली नाही तर, त्यांना 20 फेब्रुवारी रोजी मॉप-अप राऊंडच्या वेळी गोळी देण्यात येणार आहे. 1 वर्ष आतील बालकांना गोळी देण्यात येऊ नये, 1 वर्ष ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना अर्धी गोळी देण्यात यावी, अशा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तरी या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांनी केले आहे.

जंतनाशक गोळी खाल्याने होणारे लाभ

जंतनाशक गोळी खाल्ल्याने रक्तक्षय कमी होतो.
बालक आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे शाळेतील उपस्थिती वाढते.
मुले क्रियाशील बनतात व मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते, आरोग्य चांगले राहते.
अल्बेडॅझोलच्या एका गोळीमुळे जंताचा नाश होण्यास मदत होते.

13 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात जंतनाशक मोहिम सर्वत्र राबविण्यात येते. जंतनाशक गोळी खाल्ल्याने मुलांचे आरोग्य चांगले राहते. यामुळे 1 ते 19 वयोगटातील प्रत्येक मुलामुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. गोळ्या वाटपाचे नियोजन करण्यात आले असून, शाळा, अंगणवाडी स्तरावर वाटप होईल. प्रत्येक मुलामुलींनी गोळी घ्यावी. या मोहिमेला पालकांनी सहकार्य करावे.

डॉ. भरत बास्टेवाड
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड
Exit mobile version