पाच लाख 86 हजार मुलामुलींना देणार जंतनाशक गोळ्या ; 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम
। अलिबाग । प्रतिनिधी ।
आतड्यांना सूज येणे, पोटदुखी, भूक मंदावणे, उलट्या, अतिसार तसेच इतर अॅनिमियासारखे आजार जंत दोषामुळे होण्याची भिती आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाच लाख 86 मुलामुलींना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत.
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यातील एक वर्ष ते 19 वर्ष वयोगटातील 5 लाख 85 हजार 7 मुलामुलींना बुधवारी (दि.4) जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबविली जाणार आहे. 3 हजार 242 शाळा, 3 हजार 151 अंगणवाड्यांमधून जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. मुलांचे आरोग्य चांगले राहवे. त्यांना जंताचा त्रास होऊ नये यासाठी पावले उचलण्यात आली आहे. जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्यामधील शिक्षक व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने जंतनाशक गोळ्या वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. चार डिसेंबरला जंतनाशक गोळी देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आली आहे. ज्या मुलामुलींना कोणत्याही कारणाने 4 डिसेंबर रोजी जंतनाशक गोळी मिळाली नाही तर, त्यांना 10 डिसेंबर रोजी मॉप-अप राऊंडच्या वेळी गोळी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे. गोळ्या देण्याची मोहिम यशस्वी करण्याकरिता ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र या ठिकाणी कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका सहभाग नोंदविला जाणार आहे.
या पध्दतीने दिली जाणार गोळी
एक वर्षाआतील मुला मुलींना गोळी दिली जाणार नाही. एक ते दोन वर्ष वयोगटातील बालकांना अर्धी गोळी पाण्यातून देण्यात यावी.त्यापुढील 19 वर्षापर्यंतच्या मुलांनी एक गोळी चावून खाल्यानंतर त्यांना पाणी द्यावे अशा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.त्यापध्दतीने नियोजनही केले जाणार आहे. या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांनी केले आहे.
जंतनाशक गोळी खाल्याने होणारे लाभ
- जंतनाशक गोळी खाल्ल्याने रक्तक्षय कमी होतो.
- बालक आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते,त्यामुळे शाळेतील उपस्थिती वाढते.
- मुले क्रियाशील बनतात . मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते, आरोग्य चांगले राहते.
- अल्बेडझोलच्या एका गोळीमुळे जंताचा नाश होण्यास
मदत होते.