धोत्रेवाडी लाखो खर्चूनही पाणी नाही

ग्रामस्थांची चौकशीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत मधील धोत्रेवाडी येथे नळपाणी योजना जलजीवन मिशन मधून राबविण्यात येत आहे. शासनाने 81 लाख खर्चून या ठिकाणी नळपाणी योजना राबविली असून या नळपाणी योजनेचे पाणी आदिवासी लोकांच्या घरात पोहचले नाही. त्यामुळे सदर नळपाणी योजनेची चौकशी करण्याची मागणी आणि उपोषण करण्याचा इशारा आदिवासी ग्रामस्थांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन दिला आहे.

धोतरे गाव व दोन धोत्रेवाडी अशी 81 लाखांची शासनाने जलजीवन योजना राबवुन वर्ष होऊन गेले तरी दोन्हीही आदिवासी वाडयांना हर घर नल या योजने पासून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. जवळपास 500 लोकसंख्या असलेल्या या वाड्या अनेक वर्षापासून टंचाई ग्रस्त आहेत. दोन्हीही वाड्यांना जलजीवन मिशन योजने अंतर्गत प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा होईल या आशेने महीला वर्गात आनंदाचे वातावरण होते. गेल्या कित्येक वर्षांपासून डोक्यावरचा हंडा हातात येईल का? असा प्रश्‍न ग्रामस्थ विचारात आहेत.

जलजीवन मिशन योजना एक गाव आणि दोन आदिवासी वाड्यांना राबविण्यासाठी मंजूरी देऊन योजनाही पुर्ण झाली. मग दोन्हीही आदिवासी वाडयांना पाण्यापासून वंचित का ठेवले जात आहे. आम्ही आदिवासी आहोत म्हणून आम्हाला या योजनेपासून वंचित ठेवले जात आहे का, असा प्रश्‍न आदिवासी ग्रामस्थांना पडला आहे. या तालुक्याचे तहसीलदार आणि कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन आदिवासी वाडी मधील नळाचे पाणी पळविणार्‍या ठेकेदार आणि अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी भालचंद्र किसन मधे, राम कान्हु आगीवले, दत्तात्रय दरवडा, मारुती दरवडा, गणेश मांगे, सुरेश दरवडा, जयराम दरवडा, काशिनाथ पादीर आणि कर्जत पंचायत समिती माजी उपसभापती जयवंती हिंदोळा आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version