रेलिंग तुटल्या, खड्डे, प्रवास धोकादायक
| पाली । वार्ताहर ।
दोन ते तीन दिवसा पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदी दुथडी भरुन वाहत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून वाकण पाली राज्य महामार्गावरील पाली अंबा नदी पुलावरून 4 ते 5 वेळा पाणी गेले. यामुळे पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे तुटले आहेत. शिवाय पुलावर मोठाले खड्डे पडले आहेत. पुलाच्या एका बाजूला चिखल व राडारोडा पसरला आहे. यामुळे येथून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. तसेच वाहन चालक आणि पादचार्यांची खूप गैरसोय होत आहे.
गणपती सणासाठी तात्पुरती मलम पट्टी केली होती. परंतु आत्ता पुन्हा पुलाची दैना उडालेली दिसत आहे. वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरील हा पुल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने जाणारे प्रवाशी, वाहने व मालवाहू वाहने याच मार्गावरून जातात. येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहनांची वाहतुक होते. पावसाळ्या आधीच या पुलाच्या मध्यावरील काही लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) तुटले आहेत. आणि आता पुलावरून पाणी गेल्यामुळे इतरही रेलिंग वाहून गेले आहेत. त्यांना आधार देणारे सिमेंटचे काही ठोकळे देखील निसटले आहेत. कमकुवत लोखंडी कठडे, मोठाले खड्डे, क्षमतेपेक्षा अधिक वाहनांची ये-जा, वारंवार पुलावर वाहून येवून साठलेला राडारोडा यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा पुल अत्यंत धोकादायक झाला आहे. खड्ड्यात असंख्य वाहने आदळत आहेत. पादचार्यांना देखील पुलावरून जीवावर उदार होऊन वाट काढावी लागते.
वाहतुकीसाठी हा पूल अत्यंत धोकादाय झाला आहे. संरक्षण कठडयांअभावी येथे अपघाताची शक्यता आहे. येथील नवीन पुलाचे काम वेळीच होणे गरजेचे होते. मात्र त्यामुळे आता वाहन चालक, प्रवासी व पादाचारी यांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. शिवाय पुलावरून पाणी गेल्यामुळे प्रचंड गैरसोय होते. नवा पूल होईपर्यंत किमान या जुन्या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी.
रविंद्रनाथ ओव्हाळ,
सामाजिक कार्यकर्ते, पाली
या मार्गावरील कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच सर्व कामे पूर्ण करणार आहोत.
सचिन निफाडे,
उपअभियंता, एमएसआरडीसी
नवीन पूल अपूर्ण
अंबा नदीवरील पूल जुना अरुंद व कमी उंचीचा आहे. या पुलाच्या बाजूला नव्याने मोठा पूल बांधण्यात येत आहे. मात्र कामातील दिरंगाई व संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे या पुलाचे काम अपूर्ण आहे. या पुलाचे काम वेळीच पूर्ण झाले असते तर प्रवासी व विद्यार्थ्यांचा असा खोळंबा व गैरसोय झाली नसती.