तलासरी-मोरबे प्रवास होणार सुसाट
। मुंबई । प्रतिनिधी ।
भारताची राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 1,386 किमी लांबीचा दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग बांधण्यात येत आहे. या महामार्गातील महाराष्ट्रातून जाणार्या शेवटच्या तलासरी-मोरबे दरम्यानच्या 156 किमी लांबीच्या टप्प्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. आतापर्यंत या टप्प्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे एनएचएआयचे नियोजन आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर 2026 मध्ये हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असून तलासरी-मोरबे प्रवास सुसाट होणार आहे.
एनएचएआयकडून 1,386 किमी लांबीच्या मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाचे काम सध्या अनेक टप्प्यात सुरू आहे. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतून हा महामार्ग जात आहे. यापैकी दिल्ली-राजस्थानदरम्यानचा टप्पा सध्या वाहतूक सेवेत दाखल झाला असून पुढील राज्यातील टप्प्यांचे काम वेगात सुरू आहे. महाराष्ट्राचा विचार करता तलासरी-मोरबे दरम्यानच्या 156 किमी लांबीच्या टप्प्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. आतापर्यंत या आठ पदरी महामार्गाचे 80 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एनएचएआय ठाणे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी दिली आहे. उर्वरित काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे एनएचएआयचे नियोजन असून हे काम पूर्ण झाल्यानंतर 2026 मध्ये हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. तसेच, संपूर्ण दिल्ली-मुंबई महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबईहून थेट दिल्ली केवळ 12 तासांत गाठता येणार आहे
भुयारीकरण करणे आव्हानात्मक
माथेरानच्या डोंगराखालून जाणार्या दुहेरी बोगद्याचा (ट्विन टनेल) समावेश आहे. पर्यावरणदृष्ट्या संवदेनशील अशा माथेरानच्या डोंगराखालून भुयारीकरण करणे एनएचएआयसाठी आव्हानात्मक होते. हे आव्हान पेलण्यासाठी एनएचएआयने न्यू ऑस्ट्रीयन टनेल पद्धतीचा (एनएटीएम) वापर केला. डोंगराखाली स्फोट करून, भुयारीकरण पूर्ण करून दोन एनएटीएम काही महिन्यांपूर्वीच बाहेर आल्याचेही चिटणीस यांनी सांगितले आहे. एका एनएटीएमने 15 महिन्यांत, तर दुसर्या एनएटीएमने 17 महिन्यांत भुयारीकरणाचे काम पूर्ण केले.
बोगद्याचे 70 टक्के काम पूर्ण
अंबरनाथमधील भोज गाव ते पनवेलमधील मोरबे दरम्यान हा 4.16 किमी लांबीचा आणि 21.45 मीटर रुंदीचा दुहेरी बोगदा आहे. या बोगद्याची उंची 5.5 मीटर आहे. अशा या बोगद्याचे काम आतापर्यंत 70 टक्के पूर्ण झाल्याचेही चिटणीस यांनी सांगितले आहे. या दुहेरी बोगद्याच्या उर्वरित कामासह तलासरी-मोरबे टप्प्याचे उर्वरित काम डिसेंबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. हे काम पूर्ण झाल्यानंतर हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल. त्यामुळे तलासरी-मोरबे प्रवास अतिजलद होण्यास मदत होईल. तर, दुसरीकडे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तसेच ठाणे, कल्याण, भिवंडीतील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल, असा दावा यानिमित्ताने एमएचएआयने केला आहे.