। अलिबाग । वार्ताहर ।
जिल्ह्याला दरवर्षी महापूर, भूस्खलन व चक्री वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. अशा ठिकाणी तातडीने मदतकार्य करण्यासाठी सरकारी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा प्रशिक्षित असावी यासाठी जिल्ह्यातील विविध विभागातील 50 अधिकारी-कर्मचारी, संस्था प्रतिनिधी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी भुवनेश्वरला रवाना झाले आहेत. यात महाडमधील 22 जणांचा समावेश आहे. भुवनेश्वर येथे 22 ते 24 जून दरम्यान त्यांचे प्रशिक्षण होणार आहे.
जिल्ह्यातील स्वयंसेवक, अधिकारी-कर्मचार्यांच्या 50-50 च्या दोन बॅचचे प्रशिक्षण यापूर्वी पूर्ण झाले असून ही तिसरी बॅच आहे. यामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे. गतवर्षी 22 जुलैला महाडमध्ये महापूराने हाहाकार माजवला होता. तर याच दिवशी तळीये गावात दरड कोसळून 86 जण मरण पावले होते. जिल्ह्यात सातत्याने आपत्ती येत असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. शिवाय सावित्री पूल दुर्घटना, तारिक गार्डन इमारत दुर्घटना, आंबेनळी घाट बस अपघात, कोकण रेल्वे अपघात यात शेकडोंचे बळी गेले आहेत.
जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सरकारी यंत्रणेला प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने महापूर व चक्रीवादळाच्या अनुषंगाने पूर्वतयारी व धोका सौम्यीकरणाच्या उपाययोजना केलेल्या आहेत. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर दरवर्षी येणार्या चक्रीवादळामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला पूर्वतयारी करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यानुसार या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील पोलीस, महसूल, नगरपालिका, जिल्हा परिषद यासह विविध विभागाचे 50 कर्मचारी सहभागी झाले आहेत.