सिव्हिलमध्ये धोक्याची तार, बेफिकीर कारभार; गळका स्लॅब, अस्वच्छता अन् बंद सीटीस्कॅन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अमरावतीतील भीषण रुग्णालय दुर्घटनेने संपूर्ण राज्यातील रुग्णालयांच्या विद्युत आणि अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 24 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रायगड जिल्हा रुग्णालयातील विद्युत यंत्रणा, उपकरणांची देखभाल आणि सुरक्षा ऑडिटवर शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, माजी तालुका चिटणीस अनिल पाटील, तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, नगरसेवक अनिल चोपडा, नगरसेविका अश्विनी ठोसर, तसेच सागर पेरेकर, वेदांत कंटक यांनी गुरुवारी (दि.27) जिल्हा रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी स्लॅबची गळती, अस्वच्छ स्वच्छतागृह, सर्वत्र पसरेली दुर्गंधी, बंद पडलेले सीटीस्कॅन, विद्यूत वाहिन्या आणि इमारतीची दुरवस्था पाहून त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
जिल्हा रुग्णालयातील सध्याची परिस्थिती पाहता रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे चित्र समोर येत आहे. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी रुग्णालयाचे विद्युत ऑडिटच झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आणली. जिल्ह्यातील हजारो रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेल्या या रुग्णालयात चोवीस तास वीजपुरवठा सुरू असतो. आयसीयू, ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन यंत्रणा, व्हेंटिलेटर आणि विविध अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे विजेवर अवलंबून आहेत. अशा ठिकाणी विद्युत यंत्रणेची सुरक्षा तपासणीच होत नसेल, तर रुग्णालय प्रशासन नेमके कोणत्या सुरक्षेच्या भरोशावर कारभार चालवत आहे? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
फायर ऑडीट करण्यापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे विद्युत ऑडिट झाले आहे का? असा थेट सवाल विचारत जर विद्युत ऑडिट झालेलेच नसेल, तर अमरावतीसारख्या दुर्घटनेतूनही प्रशासनाने धडा घेतलेला नाही का, असा संतप्त सवाल शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केला आहे. अमरावतीसारखी दुर्घटना घडल्यानंतर चौकशी समित्या नेमण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच विद्युत ऑडिट करून संभाव्य धोके दूर करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
शॉर्टसर्किटनंतर पंचनामा नको; आधीच खबरदारी हवी
विद्युत यंत्रणेतील एखादा बिघाड किंवा शॉर्टसर्किट मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देऊ शकतो. आग लागल्यास गंभीर अवस्थेतील रुग्णांना सुरक्षित बाहेर काढणेही मोठे आव्हान ठरू शकते. विशेषतः आयसीयू किंवा ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांच्या जीविताला थेट धोका निर्माण होऊ शकतो. मात्र संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याऐवजी दुर्घटना घडण्याची वाट पाहिली जात आहे का? असा सवाल चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केला.
ऑडिट नाही…जबाबदारी कोणाची?
विद्युत ऑडिट झाले नसल्यास त्याला जबाबदार कोण? रुग्णालयातील विद्युत यंत्रणेची शेवटची तपासणी कधी झाली? विद्युत सुरक्षेतील त्रुटी कोणत्या? त्या दूर करण्यासाठी काय उपाय केले? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेसमोर देणे आवश्यक आहे.
दुर्घटना होण्यापूर्वी ऑडिट करा!
रुग्णांच्या जीविताशी संबंधित हा प्रश्न असल्याने तातडीने संपूर्ण विद्युत सुरक्षा ऑडिट करून त्रुटींचा अहवाल सार्वजनिक करावा आणि धोकादायक यंत्रणा त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी शेकापकडून करण्यात येत आहे.
सिव्हिलमध्ये 51 टक्के पदे रिक्त
194 मंजूर पदांपैकी तब्बल 99 जागा रिकाम्या
रायगड जिल्ह्याच्या मुख्य शासकीय रुग्णालयातच मनुष्यबळाचा मोठा तुटवडा असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबागमधील विविध संवर्गातील 194 मंजूर पदांपैकी तब्बल 99 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच रुग्णालयातील जवळपास 51 टक्के पदांवर कर्मचारीच उपलब्ध नाहीत.
उपलब्ध आकडेवारीनुसार तज्ज्ञ डॉक्टरांची 42 पदे मंजूर असताना 16 पदे भरलेली असून तब्बल 26 पदे रिक्त आहेत. तर अधिपरिचारिकांची 96 मंजूर पदांपैकी 55 पदे भरलेली असून 41 पदे रिक्त आहेत. रुग्णालयातील रुग्णसेवेचा मोठा भार याच मनुष्यबळावर असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याचे चित्र आहे.
याशिवाय सिस्टर ट्यूटर 13, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर 2, शुश्रुषा अधिकारी 1, प्राचार्य 1 आणि उपप्राचार्य 1 पदे रिक्त आहेत. नेत्रचिकित्सा अधिकाऱ्यांच्या 12 मंजूर पदांपैकी 11 पदे भरलेली असली तरी एक पद रिक्त आहे. वरिष्ठ लिपिकाची दोन, स्वच्छता निरीक्षकाची एक आणि कनिष्ठ लिपिकाची चार पदेही रिक्त असल्याचे कागदपत्रातून स्पष्ट होते.
दरम्यान, जिल्हा रुग्णालय अलिबाग अंतर्गत एआरटी केंद्रासाठी 2026 मध्ये स्टाफ नर्स आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या कंत्राटी नियुक्तीसाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. मात्र नियमित आस्थापनेवरील मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांचा प्रश्न कायम असल्याने रुग्णालयातील रुग्णसेवा, डॉक्टर-कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण आणि उपचारांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सिव्हिलची अवस्था
मंजूर पदे : 194
भरलेली पदे : 95
रिक्त पदे : 99
जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. रुग्णालयाची अवस्था चिंताजनक आहे. फायर ऑडिटचा प्रश्न गंभीर असून, स्लॅब कोसळणे, इमारतीला तडे जाणे, अग्निसुरक्षेची अपुरी कामे, खराब पत्रे आणि दयनीय स्वच्छतागृहे यामुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक बांधिलकीतून रुग्णालयाला देण्यात आलेल्या वस्तूंचाही योग्य वापर होत नसल्याचे दिसून येते. एवढा निधी खर्च होऊनही प्रत्यक्षात सुविधांचा दर्जा सुधारलेला दिसत नाही. मग हा कोट्यवधींचा निधी नेमका कुठे आणि कशावर खर्च झाला, याची चौकशी झाली पाहिजे. आरोग्य विभागाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थिती तपासावी. रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू राहणार असेल तर शेकाप गप्प बसणार नाही. आरोग्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा शेकाप स्टाईलने तीव्र आंदोलन छेडून प्रशासनाला जाब विचारला जाईल.
चित्रलेखा पाटील,
शेकाप प्रवक्त्या
सिटीस्कॅन मशीन वारंवार बंद पडण्याचा प्रकार घडत आहे. पदे रिक्त असल्याचा फटका रुग्णांना बसत आहे. तज्ञ डॉक्टरांचा अभाव ही समस्या गंभीर झाली आहे. वेगवेगळ्या माध्यमातून निधी व साहित्य उपलब्ध होत असतानाही सुविधा उपलब्ध नाहीत. रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. सर्जिकल वार्ड पनवेलमध्ये पाठविण्याची हालचाल सुरु झाली आहे.
सागर पेरेकर
सामाजिक कार्यकर्ते
अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार गलथान पध्दतीने सुरु आहे. अस्ताव्यस्त झालेले रुग्णालय आहे. रुग्ण प्रशासनाचे कोणावरही नियंत्रण नाही. फक्त ताप उलटी जुलाबवरच उपचार होत आहे. अन्य आजारांवर योग्य उपचार होत नाही. त्यांना अन्य रुग्णालयात स्थलांतर केले जाते. याकडे आरोग्यमंत्र्यांनी व प्रशासनाने योग्य पध्दतीने लक्ष देणे आवश्यक आहे.
अनिल चोपडा
पाणी सभापती
अलिबाग नगर परिषद
