राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाची मागणी
। खरोशी । वार्ताहर ।
पुरोगामी महाराष्ट्रातील ही शिक्षण गंगा अखंड वाहत राहावी, यासाठी 0 ते 20 पटसंख्या असणार्या शाळा बंदची कार्यवाही थांबवावी, अशी विनंती राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष शामभाऊ लेडे, राज्य सरचिटणीस अनिल नाचपल्ले यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री यांना करण्यात आली आहे. यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य,जिल्हाध्यक्ष व महासंघ पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने राज्यातील 0 ते 20 पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही कार्यवाही राज्यभर सुरू ही करण्यात आली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व बालकांचा शिक्षण हा हक्क आहे. एकीकडे शाळांची स्थिती सुधारण्याऐवजी त्या बंदच करणे हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. तसेच बालकांच्या संविधानिक हक्काचे उल्लंघन ठरेल. यासाठी सामाजिक लढा उभारणे गरजेचे आहे. शाळा जर बंद झाल्या, तर त्यांचा त्या त्या भागातील शिक्षणावर गंभीर व विपरीत परिणाम होऊन बालक शिक्षणापासून वंचित राहील, अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले.