| नेरळ | प्रतिनिधी |
कृषिरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांनी शेतकर्यांचे श्रम कमी करण्यासाठी सगुणा राईस टेक्निक म्हणजे एस.आर.टी. ही पद्धती शोधून काढली. या शेती पद्धतीमुळे राज्यातील शेतकर्यांना मोठा हातभार मिळाला आहे. अन्य जिल्ह्यामध्येही आता एस.आर.टी. पद्दतीने शेती केली जात आहे. यामुळे भाताची शेतीसह अन्य दोन पिके वर्षभरात घेऊ लागली आहेत.
अनेक वर्षे शेखर भडसावळे आणि त्यांचे सहकारी भाताच्या नविन जाती विकसित करण्यात आघाडीवर आहेत. जास्त उत्पादन देणार्या भाताच्या अनेक जाती सगुणा बागेने विकसित केल्या आहेत. त्या प्रत्येक वेळी शेतात वर्षातून दोनदा पीके घेण्यासाठी ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करायचे. त्याचवेळी मजूर शोधून लावणी तसेच मशागत करावी लागत असल्याने शेखर आणि त्यांच्या सहकारी यांनी नविन काही तर उपाय शोधले पाहिजेत याची वारंवार चर्चा केली. त्यातून एस.आर.टी. जन्माला आली. सगुणाबाग राईस टेक्निक म्हणजे नांगरणी न करता शेतात पीके घेण्याची पद्धत. सगुणा रूरल फाउंडेशनच्या माध्यमातून एक लोखंडी अवजार विकसित करण्यात आले, त्याच्या सहायाने एकदा वाफे पाडल्यानंतर पुन्हा चार-पाच वर्षे कोणतेही नविन वाफे पाडण्याची गरज लागणार नव्हती. त्याचवेळी वेळेवर कीटक नाशक यांची फवारणी, पाण्याचे नियोजन केल्यास वर्षातून किमान तीन पीके घेता येणे या पद्यतीत सहज शक्य होते. त्याचवेळी प्रामुख्याने कमी पावसाच्या भागात देखील ही एसआरटी पद्धत फायदेशीर ठरली आहे.
या पद्धतीचा अवलंब राज्यातील असंख्य शेतकरी करू लागले, त्यानंतर राज्य सरकारच्या कृषी विभागाने या जमिनीची धूप थांबते आणि शेतकऱयांचे श्रम देखील कमी होतात हे सिद्ध केले आणि त्यात राज्य सरकारने आपले कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून प्रसार देखील सुरु केला. त्याचवेळी एस.आर.टी. पद्धतीला शासनाच्या यादीत समावेश केल्याने कर्जत तालुक्यात हे तंत्र विकसित झाल्यानंतर त्याचा या भागातील शेतकर्यांनी स्वीकार केला आणि रायगड जिल्ह्यात किमान 1000 शेतकरी एस.आर.टी. पद्धतींने भाताची शेती करीत असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एस.आर.टी. पद्धतीने भाताची शेती केली जात आहे. त्यात वर्षातून तीन पिके या पद्धतीने घेता येणे शक्य असल्याने शेतकर्यांनी या पद्धतीला आपलेसे केले आहे. राज्यातील किमान 10 हजार शेतकरी एस.आर.टी. पद्धतीने भाताची तसेच भुईमूग आणि अन्य प्रकारची शेती करतात.
अशी आहे एस.आर.टी. पद्धत
शेत जमिनीत पिकांचे उत्पादन वाढावे म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खते यांचा वापर करीत असतात. त्यामुळे शेतातील सेंद्रीय कर्बचे प्रमाण प्रचंड खाली आल्याचे दिसून येत आहे. यावर एस.आर.टी. शेती महत्वाची ठरत आहे, कारण सगुणाबाग मध्ये गेली सहा वर्षे एस.आर.टी. पद्धतीचा अवलंब शेती केली जात आहे. त्यामुळे तेथील जमीनीतील सेंद्रिय कर्बचे प्रमाण 0.3% वरुन 1.23% पर्यन्त वाढले आहे. याचे कारण देखिल महत्वाचे असून एस.आर.टी. पद्धतीमध्ये केवळ सेंद्रिय खते वापरली जात असतात. ती सेंद्रिय खते शेतात वापरली जात असतांना वेगळी पद्धत पिकासाठी अवलंबिली जाते. त्याचा परिणाम त्या शेतात एक वर्षे नाही तर पुढे काही वर्षे दिसून येत असतो. दूसरीकड़े एस.आर.टी. तंत्रद्यानमुळे एका वर्षात किमान तीन पीके घेण्याचे नियोजन करता येते. सगुणाबागेमध्ये एका वर्षाच्या हंगामात भात, कांदा, मुग, भुईमुग, भेंडी, अशी पीके घेतली जात आहेत. त्यात भातावर सर्वाधिक संशोधन सगुणा रूरल फाउंडेशन करीत आहे. कारण भाताचे आपल्या सर्वांच्या अन्नातील प्रमाण अधिक असल्याचे एक कारण आहे.