। अलिबाग । विशेष प्रतिनिधी
मागच्या वेळची परिस्थिती वेगळी होती. राज्य सरकार अस्थिर झाले होेते. आमदार गायब होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पनवेल मनपाच्या नगरसेवकांना ही निमंत्रित केले नव्हते. आता राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात नियोजन समितीच्या बैठका पार पडल्यात. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊन जनतेसाठीचे पैसे खर्च होणे आवश्यक आहे. आता जिल्हा नियोजन समितीची बैठक या क्षणाला रद्द करा ही मागणी हास्यास्पद असल्याचे मत माजी आमदार पंडित पाटील यांनी व्यक्त केले आहे.
खा.सुनील तटकरे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द करण्याची मागणी केली आहे. त्या मागणीबाबत मत व्यक्त करताना पंडीत पाटील बोलत होते. त्यावेळी आणि आता परिस्थिती वेगवेगळी आहे. राज्यभरात जिल्हा परिषद, नगर परिषद बरखास्त असताना प्रत्येक ठिकाणी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आल्या आहेत. फक्त रायगडलाच होते असा भाग नाही. बैठका घेऊन आलेला जनतेचा निधी तो लोकांपर्यत पोहचविण्याची गरज आहे. त्यामुळे अशा प्रकारे आक्षेप घेतला जात असेल तर ते दुर्दैव आहे असेही पंडीत पाटील यांनी म्हटले आहे.