आठरा किलोमीटरच्या प्रवासासाठी दीड तासाचा कालावधी
| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल-मुब्रा महामार्गाची पावसामुळे अनेक ठिकाणी चाळण झाली आहे. त्यातच महामार्गावर वारंवार होत असणार्या वाहतूक कोंडीमुळे कळंबोली सर्कल ते शीळ फाटा दरम्यानच्या केवळ 18 किलोमीटर च्या प्रवासासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागत असल्याने या मार्गांवर करण्यात येणारी टोल वसुली बंद का करण्यात येऊ नये असा सवाल वाहतूक कोंडीमुळे त्रस्त वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे.
महामार्गावरून प्रवास करणार्या वाहनांचा प्रवास वाहतूक कोंडी मुक्त व वेगवान व्हावा या हेतूने कळंबोली सर्कल ते शीळ फाटा दरम्यान कळंबोली वसाहत व नावडे वसाहत या ठिकाणी एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाण पुलांची निर्मिती करण्यात आली आहे. 24 किलोमीटर लांबीच्या या मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून ऐका खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली या बदल्यात मार्गाचा वापर करणार्या वाहनचालकांकडून टोल वसुली करण्याची परवानगी आई आर बी ला देण्यात आली असून रोहिंजन या ठिकाणी उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावर टोल वसुली देखील केली जात आहे. पावसामुळे या मार्गवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच मार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कळंबोली सर्कल, रोडपाली सर्कल त्याच प्रमाणे तळोजा वसाहत येथे सिग्नलची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या यंत्रणेत देखील वारंवार बिघाड होत असल्याने निर्माण होणार्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढतांना मेटाकुटीला येणार्या वाहनचालकांकडून मार्गांवर केल्या जात असलेल्या टोल वसुलीबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
उड्डाण पुलावरच वाहतूक कोंडी
वाहनचलकांचा प्रवास वेगवान व्हावा या हेतूने कळंबोली वसाहत व नावडे वसाहत या ठिकाणी उड्डाण पूल बांधण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या याच उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने उड्डाण पूल उभारण्याचा फायदाच काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कामा निमित्त मुब्रा – पनवेल महामंर्गावरून नियमित प्रवास करावा लागतो. मात्र या ठिकाणी होणार्या वाहतूक कोंडीमुळे नियमित वेळी कामा ठिकाणी पोहचणे अशक्य होत आहे.
विशाल घुटुकडे
व्यावसायिक