। मुरूड/ जंजिरा । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यात रविवारपासून पावसाचे अखेर आगमन झाल्याने बळीराजा आनंदीत झाला आहे. सोमवारपासून नांगरणी, बेणनी अशी शेतीची कामे सुरू झाल्याची माहिती तालुक्यातील वाणदे गावचे शेतकरी तुकाराम पाटील यांनी दिली. पाऊस लांबल्याने उष्णतामान मोठ्या प्रमाणात वाढले होते. हवेत गारवा आला असून, पावसाळी पर्यटनाला सुरुवात झाल्याचे संकेतदेखील मिळत आहेत.
मधल्या काळात एक दिवस रात्री पाऊस बरसला होता. त्यानंतर तालुक्यात बहुतांश ठिकाणी भातपेरणी करण्यात आली होती. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढविली होती. पेरणी वाया जाणार अशी चिन्हे असताना पावसाचे आगमन झाल्याने सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे समुद्रात बदल होत असून, लाटा उसळू लागल्या आहेत. पर्यटनाचा सिझन नसला तरी मुरूड येथे पावसाळी पर्यटनासाठी हमखास येणार्या पर्यटकांची हजेरी निश्चित मानली जात आहे. फिरण्यासाठी मुरूड समुद्रकिनारी मज्जाव नसल्याने पहिल्या पावसात भिजून आनंद घेण्यासाठी काही प्रमाणात पर्यटक येण्याची दाट शक्यता आहे.
पावसाळा असल्याने मासेमारी बंद असून, जाळी दुरुस्ती, नौकांची डागडुजी मच्छिमारांनी सुरू केली आहे. मुरूड मार्केटमध्ये मासळीचा तुटवडा असून, रावस, पापलेट आदी मोठी मासळी दिसून येत नाही. जिताडा, बोईट, खाजणी कोलंबी, खेकडे, शिंगटी अशी मोजकीच मासळी अधूनमधून दिसून येत आहे. खूप मुसळधार पाऊस पडलेला नाही; मात्र सद्यःस्थिती पाहता यापुढे पाऊस सक्रिय राहील, असे स्पष्ट दिसत आहे. सोमवारी सकाळपासून सूर्यदर्शन झालेले नाही. रविवारी एकाच दिवसात मुरूड तालुक्यात 36 मि.मी. पाऊस पडल्याची माहिती नायब तहसीलदार कौटुंबे यांनी दिली.