। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात गेली कित्येक वर्षे विजेच्या अनेक समस्या आहेत. पोल बनविण्याच्या बेनामी कंपनी मालकाने थेट डिपीमधून वीज घेतल्याने त्या परिसरातील ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कमी व अपुरा वीज पुरवठा, कमी दाबाने होणारा पुरवठा अशा अनेक कारणांमुळे नागरिकांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तुंना फटका बसत आहे. परिणामी, नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकदा तक्रार करुनही केवळ आमदारांच्या दबावामुळे वीजचोरी करणार्या त्यांच्या बगलबच्चांवर महावितरण मेहरबान असल्याचा आरोप कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ तसेच माजी जिल्हा परिषद सदस्यांसह ग्रामस्थांनी केला आहे.
कोर्लई गावात व्यवसायाकरीता थेट महावितरणच्या डीपी बॉक्समधून अथवा खांबावरून आकडे टाकून वीज घेतली जाते. अधिकारी, कर्मचार्यांना माहीत असूनही केवळ आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी ते डोळेझाक करीत असल्याचेही ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. वीजचोरी हा अत्यंत गंभीर विषय आहे. मात्र, अधिकारी कर्मचारी तिकडे जराही लक्ष देत नाहीत. काही अधिकार्यांना महिन्याची मोठी बिदागी मिळते म्हणून चोर्यांकडे सोईस्कर दुर्लक्ष करतात, असाही ग्रामस्थांचा आरोप आहे. परिणामी, महावितरणच्या भ्रष्ट कारभाराला कोर्लई गावातील नागरिक वैतागले असल्याचा आरोपही प्रशांत मिसाळ यांनी केला आहे.
एखाद्या सामान्य ग्राहकाचे महिन्याचे बिल थकले तरी वीज तोडण्याची कारवाई होते. अवास्तव आणि चुकीच्या वीज बिलांचे वाटप ही नेहमीची तक्रार आहे. मात्र आमदारांच्या शब्दाखातर वीजचोरांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सरपंच मिसाळांसह ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या भोंगळ कारभाराविरुद्ध कोर्लई परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढण्याची तयारी सरपंच मिसाळ यांच्यासह ग्रामस्थांनी दर्शविली आहे.
कोर्लई गावात सुरु असलेल्या एका कंपनीला प्रमिला चंद्रकांत कवळे यांच्या नावाने वीजबील येते. 3 जून 2022 मध्ये त्यांनी शेवटचे बिल भरल्याची नोंद महावितरणकडे असून त्यानंतर येणार बील अद्यापही त्यांनी भरलेले नाही. त्यानंतर जुलै महिन्यात त्यांना मागील थकबाकीचे 471 रुपये व त्या महिन्याचे मिळून 1410 रुपये बिल आले. त्यानंतर मागील थकबाकी जोडून ऑगस्टमध्ये 2210 रुपये बिल आले. हे बिल अद्यापही थकीत असून त्यांची वसूली झाली नसल्याचा अहवाल वरिष्ठांकडे दिला असल्याचे महावितरणचे अधिकारी चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले. विजेचा व्यावसायिक कामासाठी वापर होत असताना बिल मात्र घरगुती पद्धतीने आकारले जात असल्याचेही निष्पन्न झालेले आहे.
अभियंत्याचा ‘नो रिप्लाय’
या संदर्भात दै. कृषीवलने महावितरणचे अभियंता मनोज चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन उचलण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे महावितरणाची नेमकी भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही