एमएसआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
| चौल | प्रतिनिधी |
एमएसआयडीसीकडून सुरू असलेल्या अलिबाग-रोहा आणि अलिबाग-मुरुड रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात आली आहे. अनेकजण या धुळीमुळे श्वसनासंबंधीच्या आजाराने बाधित झाल्याचे समजते. संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धुळीचा त्रास नागरिकांसह प्रवाशांना असह्य झाला असून, तातडीने दिवसातून किमान दोन ते तीन वेळा रस्त्यावर पाण्याचा मारा करावा, अशी संतप्त मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अलिबाग तालुक्यातील अलिबाग-रोहा आणि अलिबाग-मुरुड या महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम मागील चार-पाच महिन्यांपासून एमएसआयडीसीकडून सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून त्यावर सिमेंट खडी व मुरुमाचे थर टाकण्यात आले आहेत. मात्र, या कामादरम्यान उडणाऱ्या धुळीकडे संबंधित प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. या मार्गांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहनांची सततची वर्दळ असल्याने खोदकाम केलेल्या आणि मुरुम टाकलेल्या रस्त्यावरून वाहने गेली की प्रचंड धूळ उडते. काही क्षणांसाठी समोरील वाहन दिसेनासे होते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, संभाव्य दुर्घटनांना जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दिवसभर उन्हात तापलेल्या सिमेंट खडीमुळे धुरळा अधिक वाढतो. या मार्गावरून प्रवास करताना अक्षरशः श्वास गुदमरतो. डोळे, नाक, तोंडात धूळ शिरते. दुचाकीस्वारांसाठी प्रवास करणे कठीण झाले आहे. कपड्यांवर धुळीचा थर साचतो. रस्त्याचे खोदकाम करून मुरुम टाकण्यात आला असला तरी त्या कच्च्या रस्त्यावर नियमित पाणी मारले जात नाही. परिणामी, धुळीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काम सुरू असताना किमान उपाययोजना म्हणून दिवसातून दोन-तीन वेळा पाणी मारणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात तसे होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सिमेंटच्या धुळीमुळे श्वसनाचे आजार
रस्त्यावरुन उडणारी धूळ श्वासावाटे शरीरात जाऊन श्वसनसंस्थेत साचते. हे धूलीकण फुफ्फुसात व श्वसननलिकेत जमा होतात. ॲलर्जी असणाऱ्यांना सर्दी, खोकला, कफ, धाप लागणे असे त्रास वाढले आहेत. काहींना घशात दुखणे, डोळ्यांची जळजळ, सतत शिंक येणे, अशी लक्षणे जाणवत आहेत. दीर्घकाळ या धुळीच्या संपर्कात राहिल्यास श्वसनक्षमता कमी होण्याचा धोका तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
व्यावसायिकांना बसतोय आर्थिक फटका
रस्त्यालगत असलेल्या दुकानदार आणि व्यावसायिकांना या धुळीचा मोठा फटका बसत आहे. दिवसभर उडणाऱ्या धुळीमुळे दुकानातील वस्तूंवर थर साचतो, सामान काळवंडते. ग्राहकांची वर्दळ घटल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. स्वच्छता राखणे कठीण झाल्याने ग्राहक दुकानात येण्यास कचरतात, अशी व्यावसायिकांची तक्रार आहे.
काम वेळेत पूर्ण करा; पण नागरिकांची काळजी घ्या
रुंदीकरणाचे काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे, याला नागरिकांचा विरोध नाही. मात्र, काम करताना नागरिकांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. दिवसातून किमान दोन ते तीन वेळा सिमेंट खडी व मुरुमावर पाणी टाकून धूळ नियंत्रणात ठेवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.







