ई-रिक्षा आल्या डबघाईला

प्रशासनाच्या दुलक्षामुळे विघ्नांची मालिका

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमध्ये अनेक विघ्ने पार पडत शासनाने ई -रक्षास परवानगी दिली होती; परंतु मागील काही दिवसांपासून या रिक्षांच्या पाठीमागे साडेसाती सुरू झाली असून, सात रिक्षा चालविण्यास परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र चार ते सहा रिक्षा सुरू असल्याने पर्यटक, स्थानिक व विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.

माथेरानमध्ये अनेक वर्षाच्या संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रायोगिक तत्त्वावर ई-रिक्षा सुरू करण्यात आल्या. प्रथमतः सात ते रिक्षा नगरपालिकेने खरेदी करून हा प्रकल्प सुरू करण्यात आला. या रिक्षा खरेदी करण्यास नगरपालिकेने मोठा खर्च केला होता. गेल्या वर्षी या नवीन रिक्षा खरेदी करण्यात आल्या होत्या. सर्वप्रथम तीन महिने या रिक्षा चालविण्यात आल्या व पुढील आदेश येईपर्यंत या रिक्षा नगरपालिका परिसरामध्ये बंद अवस्थेतच पडून होत्या, त्यामुळे त्यातील काही रिक्षा या नादुरुस्त झाल्याचे उघड झाले होते. हा प्रकल्प पुन्हा एकदा न्यायालयाच्या आदेशानुसार एक वर्षासाठी सुरू करण्यात आल्यानंतर या रिक्षांची दुरुस्ती करून पुन्हा एकदा या रिक्षा ठेकेदारास चालविण्याकरिता देण्यात आल्या. ठेकेदाराकडे असलेली माणसे या रिक्षा चालवत आहेत; परंतु येथील रस्ते व नगरपालिकेच्या रिक्षा असल्याने त्या चालवताना योग्य ती काळजी न घेतली गेल्याने या रिक्षा आता डबघाईला आलेल्या आहेत. फक्त एक वर्षामध्ये या नवीन रिक्षा सतत बंद पडत आहेत. सातपैकी एक रिक्षा तर केव्हाच नादुरुस्त होऊन फक्त सहाच रिक्षा आता अस्तित्वात आहेत. पण, त्याही सारख्या सातत्याने बंद पडत असतात. त्यातील तीन ते चार रिक्षाच प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असतात. बाकीच्या रिक्षा या नादुरुस्त होत असतात. या रिक्षा चालवणारे चालक रिक्षा चालवताना योग्य ती काळजी घेत नसल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.

येथील हातरिक्षा चालक हे अनेक दिवसांपासून या रिक्षा त्यांना मिळाव्यात यासाठी सततचा पाठपुरावा करीत आहेत; परंतु त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने हातरिक्षा चालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे या हात रिक्षा चालक-मालक संघटनेने मोठा संघर्ष करून माथेरानकरिता ई-रिक्षा मिळविल्या होत्या; परंतु त्याचा फायदा मात्र ठेकेदार घेत आहे. ज्यांनी या रिक्षांसाठी संघर्ष केला ते मात्र उपाशी आहेत त्यामुळेच या रिक्षा हातरिक्षा चालकांना चालविण्यास दिल्यास लोकांना होणारा त्रास कमी होणार आहे. कारण, स्वतःची रिक्षा असल्यास माणूस योग्य तो काळजी घेतो; परंतु नगरपालिकेच्या रिक्षा असल्याने त्याकडे त्याच्या डागडुजीकडे ठेकेदार सातत्याने दुर्लक्ष करीत असल्यानेच या रिक्षा एक वर्षाच्या आत डबघाईला आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Exit mobile version