पावसाळ्यातील गावराण मुठ्यांना वाढली मागणी
। नेरळ । वार्ताहर ।
वर्षभर ऋतुंमध्ये होणारे बदल हे मानवी आयुष्यात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ज्या ज्या वस्तू आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. त्यात फळे,मासे,अन्न धान्य यांचा सिझन नुसार वापर आपल्या आहारात करणारे लोक आरोग्यवर्धक जीवन जगताना दिसतात. पावसाळयात सुरुवातीचे काही दिवस खेकडा जाती मुठे हे मांसाहारी खाद्य आरोग्यवर्धक समजले जाते.त्यात जंगलात,शेताच्या बांधावर आणि माळरानावर बिला बाहेर येणारे गावरान मुठे खरेदी करून खाण्यासाठी खवय्ये विशेष लक्ष देत असतात. दरम्यान, सध्या आरोग्यवर्धक गावरान मुठे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून खवय्यांच्या उड्या पडलेल्या दिसत आहेत.
पावसाचे आगमन झाले की गवताचा हिरवागार थर माळरानावर दिसू लागतो आणि पावसाळा वगळता अन्य काळात बिलामध्ये राहणारे मुठे,खेकडा,आदी चारा गोळा करण्यासाठी बाईला बाहेर येत असतात. अशावेळी नव्याने बाहेर पडणारे मुठे खवय्यांना त्यांच्या आरोग्यवर्धक गुणांमुळे आकर्षित करत आहेत. कोवळ्या गवतावर आणि पावसाच्या सुरुवातीलाच मिळणार्या पौष्टिक आणि चविष्ठ मुठ्यांना मागणी वाढत आहे. पावसामुळे उगवलेले कोवळे गवत तसेच शेतामध्ये पडलेले भाताचे दाणे खाण्यासाठी बाहेर पडतात. रात्रीच्या वेळीच रिमझिम पावसात हे मुठे आपल्या नांग्यांनी गवत तोडून बिळात नेवून निवांतपणे खातात. रात्रीच्या वेळी रिमझिम पाऊस पडू लागल्यावर मुठे पकडण्यासाठी खवये बाहेर पडतात. हातात गॅसबत्ती, टॉर्च किंवा जळता टायर घेतला जातो सोबत मुठे ठेवण्यासाठी सिमेंटची पोती किंवा गोणपाट असतो. रात्रभर माळरानं, शेत, गवताळ भाग किंवा डोंगर उतारावर फिरून मुठे पकडले जातात.
बत्तीच्या किंवा टॉर्चच्या उजेडात हे मुठे थांबतात मग आपण दबक्या पावलाने जाऊन त्याना पकडून पोत्यात टाकले जाते.बर्याच वेळ फिरून सुद्धा काही वेळेस मुठे हाती लागत नाही. त्यासाठी निसर्गाची साथ असावी लागते.इतर खेकड्यापेक्षा आकाराने लहान असलेल्या मुठ्याचा रंग तजेलदार काळा व पिवळा असतो. पाठीचा भाग थोडा गोलाकार वर आलेला असतो. आकाराने लहान असले तरी त्याचे मांस चविष्ठ व आरोग्यवर्धक असते. मुठे वेगवेगळ्या प्रकारे आणि पद्धतीने बनवून खाल्ले जातात.
सध्या मुठ्याचा बाजारभाव एक डजनला (12 मुठे) 100 रुपये असल्यामुळे अनेक जण पकडणे पसंत करतात. मुठे विकून अनेकांच्या हाताला देखिल दोन पैसे मिळतात. पावसाळ्याच्या सुरवातीला मिळणार्या या मुठ्यावर खवये तुटून पडतात. मुंबई, पुणे आदी शहरामध्ये राहणारे लोक गावाकडून हमखास मुठे नेतात किंवा आणायला सांगतात. खवय्यांची हौस भागविण्यासाठी आणि रोजगार मिळतो म्हणून आदिवासी लोक रात्र जागून काढतात आणि त्यातून मुठे गोळा करून बाजाराच्या ठिकाणी विक्रीसाठी आणतात. पावसाळा सुरू झाला की मुठे विक्रीसाठी येत असतात. त्यांचा हा हंगाम अगदी काही दिवसांचा असतो आणि त्यामुळे मुठे खवय्ये ही संधी सोडत नाहीत असे या काळात बाजारात फेरफटका मारल्यास लक्षात येते.
मुठे वर्षातून अगदी काही दिवस जगाच्या संपर्कात येत असतात. वर्षभर जमिनीमध्ये स्वतः खोदलेल्या बीलामध्ये राहून पावसाळा आला की सवतःला जगण्यासाठी हिरवागार चारा शोधण्यासाठी बाहेर येत असतात.त्यांचे वास्तव्य जमिनीमध्ये असल्याने त्यांच्यात असलेले गुणधर्म हे आपल्या शरीराच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामूळे चविष्ट मुठे यांच्या खरेदीसाठी खवय्यांची झुंबड उडालेली दिसून येते.
– नचिकेत घरत, खेकडे अभ्यासक