ठाकरे गटाचे लेखी पुरावे सादर
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
शिवसेना आणि धनुष्यबाणासाठी सुरु असलेल्या सत्तासंघर्षात ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारं मुख्य नेतेपद हे घटनात्मक नाही, असा मुद्दा ठाकरे गटाने आपल्या लेखी उत्तरात मांडला आहे. तर एकनाथ शिंदे यांना शिवसेनेची घटना यापूर्वी होती. पण आताच नेमकं काय झालं? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
याबाबत ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी माहिती दिली. 21 जूनपासून जो घटनाक्रम घडला, तो सर्व घटनाक्रम आम्ही निवडणूक आयोगाला दिलेल्या लेखी युक्तिवादात केला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबरोबरच यापूर्वी निवडणूक आयोगापुढे झालेल्या सुनावणीतील मुद्द्यांचाही समावेश आहे.असे म्हणाले.
याचबरोबर शिंदे गटाने ज्या प्रकारे शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता, तो दावा नेमका कसा चुकीचा आहे, हेदेखील आम्ही या युक्तिवादात मांडले असल्याची माहिती देसाई यांनी दिली आहे.
आम्ही तीन लाख प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. तसेच 20 लाख प्राथमिक सदस्यत्वाचे पुरावे दिले आहेत. त्यानुसार शिंदे गटाने पुरावे दिले, याची पडताडणी करा आणि आम्हाला न्याय द्या, अशी मागणी आयोगापुढे केली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच हा निकाल आमच्याच बाजुने लागेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.