नगरपंचायतीचे कारवाईकडे दुर्लक्ष
संतप्त ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
रसायनी | वार्ताहर |
स्वामी समर्थ मठासाठी नियोजित जागेसमोर अतिक्रमण करून टपरी थाटण्यात आली असून, वारंवार तक्रार करुनदेखील नगरपंचायत प्रशासन कारवाई करत नसल्याने संतप्त ग्रामस्थ स्वातंत्र्यदिनाला काळ्या फिती लावून निषेध करणार आहेत. तसेच सात दिवसांनंतर उपोषणाचे हत्यार उपसण्याचे खालापूर ग्रामस्थांनी ठरवले आहे.
खालापूर शहरात 1988 साली नरहरी पाटील यांच्या घरात स्वामी समर्थांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. संपूर्ण ग्रामस्थांच्या श्रद्धेच ठिकाण असून, धार्मिक कार्यक्रमाला जागा अपुरी पडत असल्याने 2003 साली ग्रामपंचायतीने पशुवैद्यकीय रुग्णालयानजीक जागा उपलब्ध करून दिली होती. त्याठिकाणी जोता बांधकाम झाले असून, भव्य मठाचे काम नियोजित आहे. परंतु, मठासमोरील जागेवर टपरी सुरू करण्यात आली असून, आसपासची जागादेखील अडवण्यात आली आहे. स्वामी भक्त आणि ग्रामस्थांनी नगरपंचायतीइकडे वारंवार पत्रव्यवहार करून सदरचे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली होती. अतिक्रमण नऊ ऑगस्टपर्यंत पूर्णपणे पाठवण्यात येईल, असे आश्वासन नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आले होते; परंतु त्यावर कोणतीच कारवाई करण्यात न आल्याने संतप्त ग्रामस्थांनी लेखी निवेदन देत स्वातंत्र्यदिनी नगरपंचायत कारभाराचा निषेध म्हणून काळ्या फिती लावण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सात दिवसांत मठासमोरील जागा मोकळी न झाल्यास साखळी उपोषणाला ग्रामस्थ बसणार आहेत. तसे निवेदन उमेश गावंड, नरहरी पाटील, सुधीर म्हात्रे, दत्ता चाळके, पुंडलिक लोते यांनी दिले आहे.
हे अतिक्रमण नगरपंचायत जागेत नसून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची जागा आहे. तरीसुद्धा अतिक्रमण करणार्यांना आम्ही नोटीस पाठवली आहे.
सुरेखा भणगे शिंदे, मुख्याधिकारी खालापूर