जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील पेंढाबे ग्रामपंचायतीच्या सरपंच रसिका रवींद्र पाटील यांचे पती रवींद्र पाटील यांनी केतकीचामळा येथील सरकारी जागेत अतिक्रमण केल्याचा आरोप अजिंक्य पाटील यांनी केला आहे. तसेच, सरपंच रसिका पाटील यांच्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांचे पद रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे सत्ताधारी शिंदे गटाच्या सरपंच रसिका पाटील यांच्यावर कारवाई होणार का, त्यांचे सरपंचपद रद्द होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पेढांबे येथील अजिंक्य पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार, केतकीचामळा येथील गट नं. 39 या मिळकतीमध्ये 1 ते 45 गावठाण प्लॉट पाडण्यात आले आहेत. त्यापैकी दहा प्लॉट अतिक्रमित असल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये प्लॉट क्रमांक 33 मध्ये सरपंच रसिका पाटील यांचे पती रवींद्र पाटील यांनी अतिक्रमण केल्याची नोंद सरकारी दप्तरीदेखील करण्यात आली आहे. याबाबत खुद्द रवींद्र पाटील यांनीही त्या जागेवर अतिक्रमण केल्याचे व घर बांधल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे गावठाणाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या सरपंचांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
रवींद्र पाटील यांनी 7 डिसेंबर 2018 रोजी तत्कालिन उपविभागीय अधिकारी यांना अतिक्रमण नियमित करण्याबाबत विनंती अर्ज केला होता. त्यानुसार अतिक्रमण नियमित करण्यासाठी अटी व शर्तींची पूर्तता करण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिले. मात्र भूमीहीन असल्याचा दाखला ते देऊ शकले नसल्याने त्याची पुर्तता करणे सरपंच रसिका पाटील यांच्या पतीला शक्य झाले नाही. त्यामुळे 11 डिसेंबर 2020 रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रानूसार, केतकीचामळा येथील अतिक्रमणावर शर्तभंगाची कारवाई करण्याबाबत कळविले. यावरुन गेली कित्येक वर्ष रविंद्र पाटील अवैध पद्धतीने सरकारी जमिनीचा वापर करीत असल्याचा आरोप अजिंक्य पाटील यांनी केला आहे.
निवडणूक लढविण्यासाठी अर्ज भरताना रसिका पाटील यांनी त्यांची सरकारी भुखंडावर अतिक्रमण असल्याची माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवली. अतिक्रमण असल्याने अपात्रतेची कारवाई होईल, याची जाणीव असतानादेखील त्यांनी निवडणूक लढवून शासनाची फसवणूक केली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 14 ज (3) चे सरासर उल्लंघन करून त्या कार्यभार सांभाळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचात अधिनियम 1958 कलम 16 नुसार सरपंच रसिका पाटील यांना सरपंच पदावरून अपात्र घोषित करण्यात येणे गरजेचे आहे. कायद्याचे उल्लंघन करून शासनाची फसवणूक करणाऱ्या सरपंचाविरोधात कारवाई करून त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी अजिंक्य पाटील यांनी केली आहे. त्यामुळे पेढांबे यांच्या सरपंच पदावर गदा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पेढांबे येथून थेट सरपंचपदाची निवडणूक लढविण्यासाठी रसिका पाटील या कधीही पात्र नव्हत्या. याबाबतची पूर्ण जाणीव असतानादेखील त्यांनी निवडणूक लढवून निवडणूकांच्या निकषाचा भंग केला. त्यांच्या पतीने सरकारी जागेत अतिक्रमण केल्याचे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी अतिक्रमण केल्याचे उघड झाले आहे. पदाचा गैरवापर करण्याचा प्रकार त्यांच्याकडून होण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
अजिंक्य पाटील, पेढांबे
अतिक्रमण केल्याबाबत महसूल मंत्र्याची कबुली रसिका पाटील यांनी पदाचा गैरवापर करीत सरकारी जागेत अतिक्रमण केल्याबाबात आ. जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दुजोरा देत केतकीचामळा येथील 10 प्लॉट धारकांनी अतिक्रमण केले असल्याचे कबुल केले. त्यामध्ये रविंद्र रघूनाथ पाटील यांचे नाव असल्याचेही त्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.
भूमीहीन असल्याचा दाखला देणे अशक्य रसिका पाटील यांचे पती रविंद्र पाटील यांनी शासनाच्या जागेत अतिक्रमण करून शासनाची फसवणूक केली आहे. ही बाब रसिका पाटील यांना माहित असतानादेखील त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. अतिक्रमण केल्याची जागा नियमीत करण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. परंतु त्यासाठी लागणारा कमी उत्पन्नाचा दाखला, भूमीहीन शेतकरी अशा अनेक प्रकारची पुर्तता करण्यास ते अपयशी ठरले आहे. भूमीहीन असल्याचा दाखला देणे अशक्य झाल्याने त्यांच्याकडून अटी शर्तीचा भंग केल्याचे समोर येत आहे.