। नवीन पनवेल । वार्ताहर ।
छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेले सुराज्य पुनर्स्थापित करण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना केली असून सरकारदरबारी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ही संघटना दबावगट म्हणून कार्य करणार असल्याचे प्रतिपादन माजी खा. छत्रपती संभाजी राजे यांनी केले. पनवेल येथील शाखेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
स्वराज्य संघटनेच्या वतीने राज्यभर स्वराज्य संकल्प अभियानांतर्गत ङ्गगाव तिथे शाखा, घर तिथे स्वराज्यफ अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत छत्रपती संभाजी राजे तीन दिवसांच्या जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून या अभियानाची सुरुवात झाली. या वेळी पनवेल एसटी स्थानक परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नवीन पनवेल येथे जिल्ह्यातील पहिल्या स्वराज्य शाखेचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठेसह पेण, खालापूर तालुक्यातील 100 स्वराज्य शाखांचे उद्घाटनही या दौर्यात केले जाणार आहे. या वेळी स्वराज्य संघटनेचे निमंत्रक विनोद साबळे, गणेश कडू आदी उपस्थित होते.