ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ

10 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना
| तळा | वार्ताहर |
केंद्र शासनाच्या सुधारित सूचनेनुसार 10 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्रलंबित शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. परंतु, सदर मुदत संपल्यावर पीएम किसान योजनेतून नावे वगळण्यात येणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना अंतिम तारखेअगोदर ई केवायसी प्रमाणिकरण, बँक खाते आधार संलग्न करुन घ्यावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते व राज्यशासन सुद्धा याच योजनेतील पात्र लाभार्थीना सहा हजार रुपयांची वाढीव आर्थिक मदत देणार आहे परंतु तालुक्यातील बऱ्याच पात्र लाभार्थ्यांचे ई केवायसी प्रमाणिकरण, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे प्रलंबित आहेत. या बाबी केंद्र शासनाने पूर्ण करणे अनिवार्य केल्या आहेत.

या अगोदर शासनाच्या सूचनेनुसार जे लाभार्थी दि.1 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत तसेच बँक खाते आधार संलग्न करणार नाही त्यांची नावे पीएम किसान योजनेतून वगळण्यात येणार असल्याच्या सूचना कृषी विभागास दिल्या होत्या. परंतु, त्यामध्ये बदल करीत सुधारित सूचनेनुसार 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर प्रधानमंत्री किसान योजनेच्या पोर्टलवरून लाभार्थी सूचीतून अशा लाभार्थींची नावे वगळली जातील व योजनेच्या लाभापासून वंचित राहण्यास संबंधित खातेदार शेतकरी स्वतः जबाबदार राहतील, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी दिली आहे.

Exit mobile version