भातलागवड संथगतीने, अद्याप 2 टक्के क्षेत्रावर लागवड; अतिवृष्टीमुळे 2 हजार हेक्टरवरील रोपवाटिकांचे नुकसान
| रायगड | प्रतिनिधी |
भातशेतीसाठी अपेक्षित असणारा मान्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाला. त्यानंतर पुन्हा गायब झाला. यामुळे खरीप हंगामातील भातशेती संकटात सापडली आहे. आधी लांबलेल्या पावसामुळे, तर नंतर अतिवृष्टीमुळे भातशेती अडचणीत सापडली आहे. जुलै महिना निम्म्याहून अधिक सरला असला तरी भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात एकूण लागवड क्षेत्राच्या केवळ 1.67 टक्के क्षेत्रावर भातलागवड करण्यात आली आहे. पावसाने दडी मारल्याने भातलागवड संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी भाताची रोपे पावसामुळे करपल्याने शेतकऱ्यावर दुष्काळाचे संकट ओढवण्याची चिन्हे दिसत आहेत.
रायगड जिल्ह्यात जवळपास 90 हजार हेक्टर भात लागवडीखालील क्षेत्र आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या लागवड क्षेत्रात सातत्याने घट होत चालली आहे. यास वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरण कारणीभूत ठरले आहे. यंदा त्यात निसर्गाच्या लहरीपणाची भर पडण्याची चिन्ह दिसत आहेत. गेल्या वर्षी जवळपास 71 हजार हेक्टरवर भातलागवड करण्यात आली होती. यावर्षी तेवढ्या क्षेत्रावरही भातलागवड होईल की नाही याबाबत साशंकता आहे.
निसर्गाचा लहरीपणा यास कारणीभूत ठरला आहे. जून महिन्याचे पहिले तीन आठवडे जिल्ह्यात पाऊस पडला नाही. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पावसाला सुरूवात झाली, त्यामुळे शेतीच्या कामांना गती मिळाली होती. पण, जुलै महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांत जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. ठिकठिकाणी पूरस्थिती उद्भवली, त्यामुळे जवळपास 2 हजार 100 हेक्टरवरील भाताच्या रोपवाटिका नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून 75 टक्के अनुदानातून बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. 14 जुलैपर्यंत जिल्ह्यातील 91 हजार 520.72 हेक्टर सरासरी भात क्षेत्रापैकी केवळ 1 हजार 527.49 हेक्टर (1.67 टक्के) क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 2.13 टक्के क्षेत्रावर लागवड झाली होती. त्यामुळे यंदा भातलागवड गेल्या वर्षाच्या तुलनेतही मागे असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. तालुकानिहाय आकडेवारी पाहता उरण तालुक्यात सर्वाधिक 24.46 टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. त्याखालोखाल सुधागडमध्ये 6.59 टक्के आणि तळा तालुक्यात 5.94 टक्के लागवड झाली आहे. तर अलिबाग, पोलादपूर, मुरूड, कर्जत, पनवेल आणि महाड या तालुक्यांमध्ये लागवडीचे प्रमाण अत्यल्प आहे. ही एक चिंताजनक बाब आहे.
जिल्ह्यात 10 जुलैपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लागवड करता आलेली नसून, पाणी ओसरल्यानंतरच पुनर्लागवडीला वेग येणार आहे. कृषी विभागाच्या मते, पुढील काही दिवस हवामान अनुकूल राहिल्यास जिल्ह्यातील भातलागवडीचा वेग वाढण्याची अपेक्षा आहे. पण, पावसाचा अनियमितपणा असाच सुरू राहिला, तर मात्र यंदा भात लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास शेतकरी संकटात सापडणार आहे.







