| पुणे | वृत्तसंस्था |
जुन्नर आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत असणाऱ्या मुरबाड येथील नगर-कल्याण रस्त्यावर दुधाचा टँकर आणि टेम्पो यांच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
अक्षय शांताराम दिघे (वय 33) आणि तेजल अक्षय दिघे (वय 26) हे पती-पत्नी नातेवाईकाच्या लग्नानिमित्त गावी आले होते. मात्र, शुक्रवारी (दि.03) दुपारी परत मुंबईला दुधाच्या टँकरमध्ये माळशेज मार्गे कल्याणला जात होते. त्यावेळी कल्याण बाजूकडून जुन्नर बाजूला येत असलेल्या मालवाहू 407 टेम्पोची नगर-कल्याण महामार्गावर आवळ्याची वाडी येथे समोरासमोर धडक झाली.
धडक एवढी भीषण होती की, दुधाच्या टँकरची टाकी तुटून बाजूला पडली. तसेच समोरच्या टेम्पोची देखील मोठे नुकसान झाले. यात बसलेले दिघे दाम्पत्य जागीच ठार झाले. तसेच टँकर चालक दत्तात्रय किसन वामन (वय 42) यांचादेखील जागेवर मृत्यू झाला. तसेच, टेम्पो चालक शकील अमजत शेख यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर टेम्पोमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.