पेणनजीक भीषण अपघात : तिघे ठार

इको- ट्रकची जोरदार धडक
। पेण । प्रतिनिधी ।
पेण – खोपोली मार्गावर वाक्रुळ येथे रविवारी संध्याकाळी ट्रक आणि इकोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघे ठार तर चौघे जखमी झाले. या अपघातामुळे परिसरातील वाहतूक बराचकाळ खंडित झाली होती. अपघातातील मयत आणि जखमी हे बाळुमामाच्या यात्रेसाठी इको ( एमएच 46 ए- 1003) मधून कोल्हापूरच्या दिशेकडे चालले होते.तर ट्रक एमएच 43- बीजी- 3234 ) हा खोपोलीहून पेणकडे येत होता.वाक्रुळजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.ही धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये इकोमधून प्रवास करणारे विक्रम गोविंदराव दिंडे,(वय 50),नागेश विक्रम दिंडे (वय27,चालक) प्राजक्ता नागेश दिंडे,वय 25 हे जागीच ठार झाले तर याच इकोमधील गजानन चंदन वडगावकर,(वय13),विकी विठ्ठल श्रीरामे(वय 15) मीनक्षी विक्रम दिंडे( वय 22)कविता विक्रम दिंडे(वय 45) हे गंभीर जखमी झाले.



अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी,युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केेले.याचवेळी येथे असलेले देवदूत टीमचे कल्पेश ठाकूर यांनी तातडीने करीत जखमींना आधी पेणमधील म्हात्रे हॉस्पिटल आणि नंतर कामोठेतील एमजीएम रुग्णालयात तातडीने रुग्णवाहिकेतून दाखल केले.यामुळे तिघा जखमींचे प्राण वाचविण्यात यश आले. अपघाताचे वृत्त समजताच माजी आम.धैर्यशील पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली.

या अपघातातील दिंडे हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे.नोकरी,व्यवसायाच्या निमित्ताने हे पेणमधील फणसडोंगरी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य करुन आहेत.दरवर्षी ते कोल्हापूर जिल्ह्यातील बाळुमामा यात्रेसाठी जात असतात.यावर्षीही निघाले असतानाच त्यांच्या परिवारावर हा मोठा घाला झाला.अपघाताचे वृत्त फणसडोंगरी परिसरात पोहोचताच दिंडे परिवाराशी संबंधितांनी शोक प्रकट केला.अपघाताची नोंद पेण पोलिसात करण्यात आली आहे. या अपघातामुळे खोपोली मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला केल्यावर ही वाहतूक पूर्ववत सुरु झाली.काहीकाळासाठी या मार्गावरील वाहतूक पनवेल मार्गे सुरु वळविण्यात आली होती.

Exit mobile version