मुरूड तालुक्यात मासेमारी नौकांची पूर्वतयारी
जिल्ह्यात 10 हजार तर मुरूड तालुक्यात 300 नौका
। मुरूड जंजिरा । प्रतिनिधी ।
पावसाळ्यात जून आणि जुलै असे दोन महिने बंद असलेली समुद्रातील मासेमारी 1 ऑगस्ट 2021 पासून अधिकृतपणे सुरू होत असल्याची माहिती रायगड जिल्हा मच्चीमार कृती समितीचे अध्यक्ष मनोहर बैले, यांनी दिली.त्यामुळे रायगडात मासेमारीस जाणार्या नौकांची पूर्व तयारी झाली असली तरी डिझेलचे दर परवडत नसल्याचे अनेक नौका मालकांनी सांगितले. यंदा भरपूर प्रमाणात मासळी मिळेल असा विश्वास अनेक मच्छिमारांनी व्यक्त केला आहे.
करंजा,उरण, मोरा, अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन समुद्र किनार्यावर सुमारे 10 हजार मोठ्या नौका असून मुरूड तालुक्यात सुमारे 300 नौका मासेमारीस सज्ज होत आहेत. रायगड मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष तथा मच्छिमार कृती समितीचे बैले, पुढे म्हणाले की, गेल्या 15 दिवसांपासून नौकांची संपूर्ण सर्व्हिसिंग आणि जाळी, भरण्याचे काम सुरू आहे. नौकांचे चोप्रान म्हणजे कडू तेल, चुना, लावण्याचे काम सुरू आहे. मुरूड तालुक्याला 40 किमी चा समुद्र किनारा लाभला असून नांदगाव, बोर्ली, कोर्लई, मजगाव, मुरूड, एकदरा, राजपुरी आदी गावे मिळून सुमारे 300 मोठया नौका आहेत. यातील काही नौका परंपरे प्रमाणे नारळी पौर्णिमा झाल्यानंतर मासेमारीस जातात अशी महिती मिळाली. एकदरा, मुरूड, राजपुरी, बोर्ली येथे किनार्यावर शाकरलेल्या नौका एकेक करून पाण्यांत उतरवल्या जात असून जाळी दुरुस्ती, खलाशी, खाद्य धान्य पदार्थ साठा, बर्फ, डिझेल भरण्यांत येत आहे. मासेमारीस सुरुवातीला जाताना प्रत्येक मोठया नौके मागे सुमारे 60 हजार रुपये खर्च येतो अशी माहिती बैले यांनी दिली. सन 2017 पासून राज्यातील 300 कोटींचा डिझेल परतावा ( विक्रीकर) शासनाकडून अद्याप आला नसल्याचे मनोहर बैले यांनी स्पष्ट केले. खोल समुद्रात ही मासेमारी केली जाते. यासाठी सहा सिलेंडर्स असणार्या नौका वापरण्यात येतात.
वादळी हवामानामुळे मुरुडच्या समुद्रात लाटा उसळत असून किनार्यावर धडकत असून पाण्याला मोठा वेग आहे. त्यामुळे 1 ऑगस्ट पासून जरी मासेमारी सुरू होत असली तरी वादळी पावसाचा अंदाज, माहिती आणि अनुभवानुसार या नौका समुद्रात मासेमारीस जातील असा कयास बैले, यांनी व्यक्त केला.2020 मध्ये मच्छिमारांना मासळीचे उत्पादन कमी प्रमाणात मिळाले होते. यावेळी दोन तीनदा वादळी तुफान समुद्रात उठल्याने त्याचा परिणाम मासळी मिळण्यावर होणार असून या मुळे मोठया प्रमाणावर समुद्रात मिळेल असा अंदाज बैले, यांनी व्यक्त केला. सध्या बोंबील मासळीचा सिझन असला तरी सुरळीत मासेमारी सुरू झाल्यास पापलेट, सुरमई, भिंग, अशी सर्व प्रकारातील मासळी ऑगस्ट महिन्या पासून मिळेल असा व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी नैसर्गिक आपतींमुळे मासळीचे सिझन वाया गेले होते, आणि मच्छिमार भरडुन मेटाकुटीस आला होता. आता नवा आशेच्या किरणांची अपेक्षा मच्चीमार बाळगून आहेत.
डीझेल वरील विक्रीकर रद्द करा
राज्यातील मच्छिमारीसाठी दिल्या जाणार्या डिझेलवरचा विक्री कर रद्द करावा अशी मच्चीमारांची या पूर्वीच केलेली मागणी आहे.यालाच डिझेल परतावा म्हटले जाते.2017 पासून सुमारे 300 कोटी रुपयांचा डिझेल परतावा शासनाकडुन मच्छिमारांना मिळालेला नाही.या बाबत रायगड जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष आर एस कोळी यांनी काल मत्स्य व्यवसाय आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना सविस्तर निवेदन सादर केले असून मच्छिमारांना दिल्या जाणार्या डिझेल वरील विक्रीकर रद्द करावा अशी मागणी केली आहे.असे न झाल्यास 1 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार्या मासेमारीवर परिणाम होऊन ठप्प होईल आणि मच्छिमारांची उपासमार होईल असे निवेदनात म्हटले आहे.