सबस्टेशन, पुलाच्या चुकीच्या नियोजनामुळे; प्रशासनाविरोधात ग्रामस्थ संतप्त
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील भाकरवड-देहेन परिसरात सुरू असलेल्या सबस्टेशन आणि पुलाच्या बांधकामामुळे भविष्यात भीषण पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थ आणि शेतकरी प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहेत. “गावकऱ्यांच्या जीवाशी खेळणारे नियोजन सुरू असून प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे,” असा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित सबस्टेशनचे बांधकाम नैसर्गिक पाण्याच्या मुख्य प्रवाहाच्या जागेवर सुरू करण्यात आले आहे. अतिवृष्टीच्या काळात भाकरवाड-देहेन मुख्य रस्त्यावरून अडीच ते तीन फूट पाणी वाहते. मात्र, आता सबस्टेशनमुळे पाण्याचा नैसर्गिक मार्ग अडवला जात असल्याने हे पाणी थेट गावातील सखल वस्तीत घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात घरांचे, शेतीचे आणि जनजीवनाचे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी याआधी आलेल्या पुराच्या घटनांची आठवण करून दिली आहे. सन 1989 मध्ये आलेल्या महापुरात गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर 2017 मध्येही परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई दिली होती. मात्र, आज त्याच भागात पुन्हा चुकीच्या पद्धतीने कामे सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या प्रकल्पामुळे भातशेती पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच शेततळ्यांमधील मत्स्य व्यवसायालाही मोठा फटका बसणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “विकासाच्या नावाखाली आमच्या उपजीविकेवर घाव घातला जात आहे,” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, देहेन गावातील मोडकळीस आलेल्या पुलाच्या नव्या बांधकामावरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सागरगड माची परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने जुन्या पुलाला चार गाळे होते. मात्र, नव्या पुलात केवळ दोनच गाळे ठेवले जात असल्याने पाण्याचा निचरा अडून भविष्यात महापुराची तीव्रता वाढू शकते, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
विशेष म्हणजे, या गंभीर प्रश्नाबाबत मा. ग्रामपंचायत सदस्य प्रीती प्रवीण पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष), मा. ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील तसेच ग्रामस्थांनी भूसंपादन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सर्कल अधिकारी, तलाठी आणि पोयनाड पोलीस स्टेशन यांना वेळोवेळी निवेदने देऊन परिस्थितीची गंभीरता निदर्शनास आणून दिली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा पाहणी करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
देहेन-भाकरवड रस्ता दरवर्षी जून ते ऑक्टोबरदरम्यान अनेकदा पाण्याखाली जातो. त्यामुळे गावांचा संपर्क तुटून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास न करता कामे सुरू असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
याचबरोबर कामाबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना कंत्राटदारांकडून पोलीस संरक्षणाच्या आड दमदाटी केली जात असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
आमचा विकासकामांना विरोध नाही. पण गावकऱ्यांच्या जीवाशी खेळणारे आणि भविष्यात महापुराला निमंत्रण देणारे नियोजन आम्ही सहन करणार नाही. प्रशासनाने तातडीने पाहणी करून पाण्याच्या निचऱ्याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात. अन्यथा भविष्यात होणाऱ्या जीवित आणि वित्तहानीस जबाबदार प्रशासनच असेल,” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ग्रामस्थांची प्रमुख मागणी
सबस्टेशनचे काम तात्काळ थांबवावे.
नैसर्गिक पाण्याचा प्रवाह कायम ठेवावा.
पुलाचे नियोजन पुन्हा तपासावे.
तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष पाहणी करावी.
ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे.
पूरनियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
स्थानिक ग्रामस्थ
1989 आणि 2017 मध्ये आम्ही महापुराचा फटका सहन केला आहे. आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, तर गाव उद्ध्वस्त होईल.
आमचा विकासाला विरोध नाही, पण चुकीच्या नियोजनामुळे गाव धोक्यात येत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही.
शेतकरी,
भाकरवाड-देहेन परिसर
वारंवार निवेदन देऊनही अधिकारी प्रत्यक्ष पाहणीस येत नाहीत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे.
प्रीती प्रवीण पाटील,
ग्रामपंचायत सदस्य
