स्थानिकांकडून लोखंडी सळ्या बदलण्याची मागणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ-कळंब राज्यमार्गावर उल्हास नदीवर दहिवली-मालेगाव येथे पूल बांधला जात आहे. यावर्षी मे महिन्यात उल्हासनदीला महापूर आला आणि नवीन पुलाच्या कामाचे तीनतेरा वाजवले. जुन्या पुलावरून पावसाळ्यात पाणी जात असल्याने त्या पुलावरून होणारी वाहतूक बंद होते आणि त्यामुळे 25 कोटी खर्चून नवीन पूल बांधला जात आहे. मात्र, त्या ठिकाणी बांधण्यात येणार्या नवीन पुलाच्या पिलरसाठी वापरण्यात आलेले लोखंडी सळ्यांचे नुकसान झाले असून या सळ्या बदलण्याची मागणी स्थानिक करीत आहेत.
माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग 76 वर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दहिवली मालेगाव येथे नवीन पूल बांधण्यात येत आहे. उल्हास नदीवर असलेल्या दहिवली-मालेगाव या जुन्या पुलावरून पावसाळ्यात दरवर्षी महापूर आल्यानंतर पुलावरून पाणी जाते आणि त्यामुळे पुलावरून पलीकडील गावांसाठी होणारी वाहतूक ठप्प होते. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येत असून त्या पुलाच्या कामासाठी शासनाने 25 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या नवीन पुलाचे पिलर उभे करण्यासाठी लोखंडी सळ्या उभ्या करण्यात आल्या होत्या. दोन पिलरच्या सळ्या 26 मे रोजी उल्हासनदीला आलेल्या महापुरात मोठे नुकसान झाले आहे. त्या सळ्या पाण्याच्या प्रवाहात झुकल्या असून पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांकडून लोखंडी सळया आणि पिलर यांची कामे बघून नवीन पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.