| खोपोली | वार्ताहर |
आठवड्यापासून मसुळधहर पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना मंगळवारी रात्री 3 वाजल्यापासून जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, पाताळगंगा नदीने व विविध भागातून येणार्या जोड नद्यांनी पातळी ओलांडली आहे. तर खोपोली शहरातील सकळ भागात पाणी साठल्याने नगरपालिका प्रशासन सज्ज असून सामजिक संघटना ही सर्वच भागावर लक्ष ठेवून नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. मंगळवारी पहाटे पासून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने अनेक भागातील विद्युत पोळ पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला असून यो सुरळीत करण्यासाठी वीज मंडळाचे कर्मचारी कार्यरत आहेत. रस्त्यावरील झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतुककोंडी झाली आहे.
मंगळवारी सायंकाळी 130.00 मी. मी. नोंद झाली आहे. काही प्रभागात व रस्त्याच कडेला असलेले गटार उलटल्याने पाणी रस्त्यावर साठल्याने वाहतुकीला अडचण होत आहे. त्यामुळे अनेक रहदारीच्या मार्गावर वाहने पाण्याचा अंदाज न आल्याने वाहने गटारात अडकण्याचे प्रकारही झाल्याने खोपोली पोलीस ही अनेक ठिकाणी बॅरिकेट लावताना दिसत असून वाहनचालकांनी पाण्यातून वाहन चालविताना सावधगिरीने वाहने चालवावे अशा सूचना देताना दिसत आहेत. अनेक भागात तहसीलदार आयुब तांबोळी व नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भागात कर्मचारी व अधिकारी वर्ग कार्यरत आहेत व परिस्थिती वर लक्ष ठेवून आहेत तर अपघातग्रस्त सामजिक संस्था, सर्प मित्र, यशवंती हायकर्स संस्था, सहज सेवा सामजिक संस्था व सामजिक कार्यकर्ते कार्यरत आहेत.
सोसायट्यांमध्ये पाणी
मंगळवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने या संततधार पावसामुळे पाताळगंगा नदीने पातळी ओलांडल्याने नदी काठच्या नागरिकांनाधोक्याचा इशारा दिला आहे. तर खोपोली शहरात नव्याने झालेल्या युनिमाऊंट हौसिंग सोसायटी, गिरनार बिल्डिंग, आशियाना हौसिंग सोसायटी सॅम्युअल मॉल, कृष्णानगर, विणानगर शिळफाटा परिसरातील टेंपो वाहनतळ सह मुंबई-पुणे मार्गावर पाणी साठले होते. अनेक भागात डोंगराळ भागातून येणार्या पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक भागात पाणी साठल्याने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र होते.
शाळा बंद
मंगळवारी सुरू झालेल्या पावसाने रौद्ररूप धारण केल्याने शाळांना सुट्टी ही जाहीर केली तर अनेक विद्यार्थी सकाळीच शाळेकडे घरातून बाहेर पडल्याने खोपोली पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी विद्यार्थी वर्गाची पाऊस कमी होईपर्यंत बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
मुसळधार पडलेल्या पावसामुळे पाताळगंगा नदीने पातळी ओलांडली होती. त्यामुळे प्रशासन या परिस्थितीकडे लक्ष ठेवून असल्याने तासन्तासाला पाण्याच्या पातळीची आकडेवारी जाहीर करून सतर्कता बाळगत होते तर काही जोड नद्या ओसंडून वाहू लागल्याने खालापुरातील तुकसई भागातील अंबा नदीच्या जोड नदी पुलावरून पाणी गेल्याने काही काळ वाहतुकीसाठी तालुका प्रशासनाने बंद केला होता तर नागरिकांना जागरुकतेचे आवाहन करीत होते.
नागोठण्यात अंबेच्या पुराचे पाणी
एस.टी. स्थानक, कोळीवाडा व मुख्य रस्ता जलमय
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणार्या मुसळधार पावसाने सुधागड तालुका व नागोठणे परिसराला झोडपून काढले. त्यामुळे येथील अंबा नदीने मंगळवारी (दि.12) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली. अंबा नदीचे हे पुराचे पाणी संध्याकाळी येथील ऐतिहासिक जुन्या पुलावरून गेल्याने वाहतूक बंद झाली. त्यामुळे नागोठण्याचा वरवठणे गावाशी संपर्क तुटला. तसेच येथील एस.टी. स्थानकासहीत लगतच असलेल्या टेम्पो स्टँड परिसरात, कोळीवाडा व नागोठणेहून पेणकडे जाण्यासाठी असलेल्या गावातील मुख्य रस्त्यावर लेकव्हू हॉटेल समोर व महाड बाजूकडे जाणार्या रस्त्यावर मरीआईच्या मंदिरासमोर अशा दोन्ही बाजूकडील रस्त्यावर पूराचे पाणी आले होते. याशिवाय नागोठण्याजवळील कोलेटी, शेतपळस गावाच्या परिसरातही पुर परिस्थिती निर्माण झाली होती.
हवामान खात्याने जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. तरी नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील आंबा नदी व खाडी किनारील गावचे ग्रामस्थांनी दक्षता बाळगून पाण्याची पातळी व परिस्थिती पाहून सुरक्षित ठिकाणी आपल्या कुटुंबासाहित स्थलांतरित व्हावे असे आवाहन यंत्रणेकडून करण्यात आले होते.
अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडून नागोठण्यात पुराचे पाणी येण्यास सुरुवात झाल्याने येथील छ. शिवाजी महाराज चौक परिसरातील सर्व लहान-मोठे दुकानदार व बाजारपेठेतील दुकानदारांनी आपल्या सामानाची सुरक्षित स्थळी हलवाहलव करण्यास सुरुवात केली होती. तर नागोठणे पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक नारायण चव्हाण यांच्यासोबत पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच नागोठणे ग्रामपंचायतीचे कर्मचारी पुर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.