| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळमधील नागरीकरण वाढते असून, त्यामुळे मोकळी जागा मिळाली की दुकाने थाटली जातात. मात्र, 200 केव्हीए क्षमतेच्या वीज रोहित्राखाली दुकान थाटण्यात आल्याने कधीही मोठा अपघात होऊ शकतो. अशी स्थिती नेरळ गावातील साई मंदिर नाका परिसरात निर्माण झाली आहे.
माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ साई मंदिर नाका येथे असलेल्या मोकळ्या जागेत दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यातील एक दुकान तर रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीज रोहित्राच्या अगदी खाली सुरु आहे. त्या ठिकाणी असलेले वीज रोहित्र हे कमी नाही, तर तब्बल 200 केव्हीए क्षमतेचे आहे. त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी कोणी स्टॉल उभा केला आहे, याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. उन्हात मोठ्या प्रमाणात वीज रोहित्र असलेल्या ठिकाणी स्फोट होत असल्याचे आढळून येत आहेत. त्यामुळे नेरळ साई मंदिर नाका येथील वीज रोहित्राजवळ अशी घटना घडल्यास तेथे व्यवसाय करणार्या तरुणाला आपला जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे महावितरण कंपनीकडून त्या दुकानधारकाला तेथे व्यवसाय करीत असल्याबद्दल कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. गेली काही दिवसात वीज रोहित्रामध्ये आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत.