यंदा विधानसभा निवडणुकीनंतर बंधार्यांची सुरूवात
| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यात वनराई बंधार्यांबाबत सरकारी आकडेवारी फुगवून सांगण्याचा प्रकार दरवर्षी होत असला तरी ज्या ज्या गावांमध्ये वनराई बंधारे यशस्वी झाले; त्या त्या गावात गुरांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच महिलांना कपडे धुणे, भांडी घासणे आदी अन्य कामांसाठी बंधारे उपयुक्त ठरल्याचे दिसून आले. मात्र, यंदा विधानसभा निवडणुकीनंतर बंधार्यांची सुरूवात झाल्याने नदी-नाल्यांतील पाणी आटून वाहून जाण्यापूर्वी प्रशासनाकडून वनराई बंधार्यांसाठी प्रयत्न केले गेले आहेत.
पोलादपूर पंचायत समितीकडून प्राप्त माहितीनुसार, पोलादपूर तालुक्यात 44 वनराई बंधारे पंचायत समितीकडून बांधण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामध्ये तुर्भे बुद्रुक, तुर्भे खुर्द, चरई, वाकण, महाळुंगे, कापडे बुदु्रक, मोरसडे, दिवील, पार्ले, उमरठ, चांभारगणी बुद्रुक, बोरावळे, गोळेगणी, वझवाडी, कुडपण, आडावळे, सवाद, माटवण, धामणदिवी, पळचिल, महालगुर, ओंबळी, पैठण, परसुले, कुडपण, कोंढवी, वझरवाडी, देवळे या ग्रामपंचायत हद्दीत प्रत्येकी एक वनराई बंधारा तसेच वाकण, सडवली, बोरघर, काटेतळी, देवपूर, धारवली, कालवली, तुर्भेकोंडा या ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी दोन वनराई बंधारे तर कोतवाल खुर्द, कोतवाल बुद्रुक, बोरज, लोहारे,भोगाव, देवळे, मोरगिरी या ग्रामपंचायत हद्दीत एकही वनराई बंधारा बांधण्यात आला नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.
पोलादपूर तालुक्यात जलजीवन योजनेतून अनेक ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याचे सांगण्यात आले असले तरी ग्रामपंचायती अंतर्गत महसुली गावांसाठी कोणतीही योजना कार्यान्वित नसल्याने दरवर्षीप्रमाणे यंदादेखील टँकरद्वारे पाणीपुरवठा करून संभाव्य टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरिस प्रस्ताव सादर करण्याची आवश्यकता महसुली गावांना भासणार आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतरच्या काळात वनराई बंधार्यांना सुरूवात न झाल्याने यंदा बंधार्यांनी अडविलेल्या पाण्याचे प्रमाण कमी आहे.
या खेरिज तालुका कृषी कार्यालयामार्फत 49 वनराई बंधारे बांधण्यात आले असून, शेतकर्यांनी हे बंधारे बांधले आहेत. पोलादपूर तालुका कृषी विभागाने फळझाडांच्या लागवडीचे जोपासना आणि संवर्धन करण्यासाठी जलकुंडाचा गोळेगणी पॅटर्न यशस्वी करून पाणीटंचाई टाळली आहे. तहसील कार्यालय आणि वनविभागाकडून किती वनराई बंधारे बांधण्यात आले याबाबतची माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र, गुरांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासोबतच ज्या गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे; अशा गावांमध्ये नदीच्या पात्रातील दगड-गोटे बाजूला सारून डवरे खणून त्यात साचणारे पाणी हंडे-कळशा आणि अन्य भांड्यांमध्ये साठविण्यासाठी सकाळ-संध्याकाळ महिलावर्गाची लगबग दिसून येत आहे.
गेल्यावर्षी 115 हून अधिक गावे व वाड्यांचा टंचाई निवारण आराखड्यामध्ये टंचाईग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात आला होता. पण, दरवर्षी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास टँकरची कमतरता भासत असल्याने उपलब्ध टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करूनही तालुक्यातील महिला व पुरूष आबालवृध्दांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.