। चिरनेर । वार्ताहर ।
अरुंद आणि खड्ड्यांच्या रस्त्यावरून होणार्या उरणच्या वाहतुकीला आता ऐसपैस रस्ते उपलब्ध झाले आहेत. या रस्त्यांवरून वाहने सुसाट धावत असल्याने उरणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे. परिणामी, नागरिकांचा वेळ आणि पैशांची बचत होऊ लागली आहे. दरम्यान, सर्व्हिस रोडवरील अवजड वाहने काढल्यास आणखी वेळ वाचू शकतो, अशी प्रतिक्रिया वाहनचालक व्यक्त करीत आहेत.
उरण हा आकारमानाने लहान तालुका असला, तरी जेएनपीए आणि अन्य बंदरांमुळे या तालुक्यात मोठे औद्योगीकरण होत आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीबरोबरच अवजड वाहनांची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे वाहतूक कोंडी ही नेहमीची समस्या आहे. जेएनपीए आणि अन्य बंदर; तसेच मालाची साठवणूक करणार्या गोदामांमध्ये येणारी वाहने वाहतूक कोंडीत तासनतास अडकून पडत असत. त्याचबरोबर प्रवासी वाहनांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसून वेळ व इंधनाच्या खर्चात वाढ होत होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जेएनपीए महामार्गाचे आठ पदरी रुंदीकरण करून उरणच्या अन्य रस्त्यांचेही रुंदीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले. यासाठी सुमारे तीन हजार कोटींचा खर्च करण्यात आला.
वाहतूक कोंडी होणार्या ठिकाणी उड्डाणपुलांची निर्मिती केल्याने उरणमध्ये येणारी वाहने आता सुसाट येत आहेत. स्थानिक गावांसाठी सर्व्हिस रोड असल्याने सध्या अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे. मात्र, याच ठिकाणी अवजड वाहने उभी केली जातात. यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ती वाहने काढली तर आणखी वेळ वाचू शकतो.
पूर्वी उरणवरून नवी मुंबई, पनवेल येथे जाण्यासाठी तास-दीड तास लागायचा. आता तेच अंतर अवघ्या 20 मिनिटांत कापता येवू लागले आहे. यात वेळ, इंधन व पैशांची मोठ्या प्रमाणात बचत होऊ लागली आहे. त्यामुळे या वेगवान मार्गांमुळे उरणच्या विकासाला अजून गती येणार आहे