। नेरळ । वार्ताहर ।
वेळेवर वेतन न मिळणे तसेच अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी नेरळ ग्रामपंचायतमधील कर्मचार्यांच्या संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असताना कर्मचार्यांकडून सोमवारी (दि.29) कामबंद आंदोलन पुकारण्यात आल्याने अनेक सोयीसुविधांबाबत ग्रामस्थांची गैरसोय झालेली दिसून आली. कामगारांच्या समस्या सोडविण्याबाबत ग्रामपंचायत कर्मचार्यांनी महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिका कर्मचार्यांचे नेतृत्व स्वीकारले होते. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी कर्जत पंचायत समितीमध्ये झालेल्या बैठकीत सर्व मागण्या लेखी स्वरूपात निवेदन देऊन मान्य केल्या होत्या. त्यात थकीत वेतन तात्काळ देण्यात यावे, तसेच ते महिन्याच्या 15 तारीखपूर्वी द्यावे.
याशिवाय कामगारांच्या मासिक वेतनातून कपात केलेले पीएफ, एलआयसी यांचे देयके वेळेवर भरली जावीत. वेतन वेळेवर होत नसल्याने अनेक कामगारांना बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते वेळेवर भरता येत नाहीत. मासिक लेखी पगार पावती देणे, सेवा ज्येष्ठतेनुसार सफाई कर्मचार्यातून मुकादम पदाची नेमणूक करणे, आदी विषयांवर ग्रामपंचायतीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने कामगार संघटनेने पंचायत समिती आणि नेरळ ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी यांना 9 मे रोजी पत्र देऊन लेखी आश्वासनाची मागणी केली होती. त्यावेळी काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने 9 जून रोजी कामगार संघटनेने स्मरणपत्र देखील दिले होते.
कामगारांच्या प्रश्नावर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. हुतात्मा भाई कोतवाल चौकात हे सर्व कामगार महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कर्मचारी कामगार संघटना यांच्या वतीने हे आंदोलन करीत आहेत. यामध्ये ग्रामपंचायत युनिटचे अध्यक्ष मिलिंद मिसाळ,चंद्रकांत राठोड, हेमंत चव्हाण, गणेश चंचे, सुभाष नाईक, संतोष दरवडा, सुनील जाधव, गणेश कोकाटे, हरीचंद्द पारधी, प्रतिभा शेळके, शिवाजी जाधव यांच्यासह अनेक कामगार या कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.