कार अपघातात चार जणांचा मृत्यू; एक जण गंभीर

। यवतमाळ । वृत्तसंस्था ।

यवतमाळ-नागपूर महामार्गवर एक भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव कारने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार दिली. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

यवतमाळ-नागपूर मार्गावर चापर्डा आणि घोटी गावाच्या दरम्यान सोमवारी (दि.01) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. यवतमाळच्या दिशेने रस्त्याच्या कडेला एक रेतीने भरलेला ट्रक उभा होता. त्याचवेळी नागपूरकडून यवतमाळकडे भरधाव येणाऱ्या इनोव्हा कारने उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती कि, यात इनोव्हा कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला असून कारमधून प्रवास करणाऱ्या पाच जणांपैकी चार जणांचा मृत्यू झाला तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. कारमधून प्रवास करणारे सर्व जण पंजाबमधून नांदेड येथे गुरुद्वारात दर्शनासाठी निघाले होते. रात्रभर सतत प्रवास केल्याने चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस सहकारी घटनास्थळी हजर होऊन तत्काळ मदतकार्य सुरु केले. तसेच, अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version