महाड | प्रतिनिधी |
महाड शहरात गुरुवारी शिरलेल्या पुराचे पाण्याने २००५ सालच्या पाण्याची पातळी पार केली. पूराचे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल असा अंदाज कुणालाच नसल्याने बैठी घरे असणाऱ्या रहिवाशांनी आपले सामान सुमान वरच्या माळ्यावर ठेवून काही जण वरच्या मजल्यावर अडकले होते रात्री ९ नंतर पाणी फुल वेगाने वाढू लागल्याने महाड सरेकर आळी मधील अनेक कुटुंबियांनी बाहेर पडण्यासाठी टाहो फोडला पत्रकार संजय भुवड यांनी आपत्ती व्यवस्थापनातील अधिकारी, पोलिस, साळुंखे रेस्क्यु टिम, एनडीआरएफच्या पथकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणाशीच संपर्क होऊ शकला नाही अखेर पत्रकार भुवड यांनी थेट पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून एनडीआरएफ च्या टिमला सरेकर आळी व दस्तुरी नाका येथे पाण्यात अडकलेल्या कुटुंबियांना काढण्यासाठी पाठवा अशी विनंती केली. परंतु बराच अवधी गेल्या नंतरही कोणतेही बचाव पथक न आल्याने सरेकर आळीतील निखिल उर्फ दादू डाखवे हा स्वत: आपल्या कुटुंबासह घराच्या वरील मजल्यावर अडकलेला असताना त्याने सर्व प्रथम घराची कौले काढून आपले आई वडील व स्वतः ला बाहेर काढले.
त्यानंतर मदतीला उमेश निंबरे, मनिकेष देसाई व गफार शेख यांना घेऊन पाण्यात अडकलेल्या कुटुंबियांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी रस्सी ट्युब घेऊन १५ ते २० फूट वाहत्या पाण्यात उतरले. या पाच जणांनी एखाद्या रेस्क्यु टिम प्रमाणे नियोजनबद्ध आखणी करून सर्व प्रथम सुरेश कदम, त्यानतर राहुल कदम, पत्रकार राजेश भुवड व शेवटी सुनिल पोटफोडे अशा चार कुटुंबियांना सुखरुपपणे राकेश वाघ राहात असणाऱ्या इमारतीमध्ये स्थलांतर केले. या कुटुंबियांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. मात्र त्या चार देवदूतांनी या सर्वाना अत्यंत पद्धतशीरपणे रस्सीला धरून ट्युबवर बसवून पाण्यातून सुरक्षित स्थळी हलवले. हे चार जण ज्यावेळी पाण्यात अडकलेल्या एकेका सदस्याला सुरक्षित स्थळी नेत होते, त्यावेळी आजुबाजुस टेरेस वरुन हे दृश्य पाहात असलेल्या रहिवाशांनी टाळ्या वाजवून या चौघांचे कौतुक करीत त्यांना प्रोत्साहन देत होते. सरेकर आळीतील हे चौघे या अडकलेल्या कुटुंबियांसाठी देवदूत ठरले. शासनाने या चार जणांचा यथोचित गौरव करावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे