चार जणांचा बुडून मृत्यू

। रसायनी । वार्ताहर ।

खालापूर तालुक्यातील पोखरवाडी नजीकच्या मोरबा डॅम साईंबंधा-यात मुंबईतील चौघांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मुंबईतील काॅलेजातील 37 मित्रांचा ग्रुप शुक्रवारी (दि.21) सकाळी सोडाई किल्यावर ट्रेकींगसाठी आला होता. तेथून जवळच्या पोखरवाडी येथील मोर्बे डॅमच्या बंधा-यात एकजण पाण्यात पोहण्यासाठी गेला असता त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या तिघा मित्रांचाही पाण्यात बुडून मृत्यु झाला आहे.

यात एकलव्य सिंग (18), ईशांत यादव (19), आकाश धर्मंदास माने (26), रणथ महादू बंदा (18) या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे, हे सर्वजण मुंबईतील विविध काॅलेजचे विद्यार्थी आहेत‌. हे सर्वजण सोंडाईं परिसरात ट्रेकींगसाठी आले होते. यातील चौघे पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, खालापूर वरिष्ठ पोलीस अधिकारी मिलिंद खोपडे, एएसआय बहाडकर, वावर्ले तलाठी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अपघातग्रस्त मदत टीमचे गुरुनाथ साठेलकर यांची अपघातग्रस्त मदत टीम यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने चारही मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले. त्यांचे चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत उपविभागीय अधिकारी विक्रम कदम पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version